Search This Blog

फेसबुक वर भेटायचं असेल तर..

Thursday, February 18, 2016

तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा!


१६५९ मधली गोष्ट आहे. आदिलशाही सुलतानाच्या राजधानीतून अफझल खान नावाचा सेनापती प्रचंड सैन्य घेऊन महाराष्ट्राच्या रोखाने  निघाला होता. आपल्याच एका सरदाराच्या मुलाने गरीब मावळे आणि शेतक-यांना स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचा मंत्र दिला आणि या भरडलेल्या भूमीत स्वराज्याची ज्योत पेटवली हे बादशाहाला सहन झालं नाही. अनेक सरदार स्वराज्यावर चालून आले पण या थोर सेनानीपुढे त्यांचं काही चाललं नाही, आणि त्याचमुळे संतापलेल्या बादशाहाने आपला सर्वात क्रूर आणि पराक्रमी सेनापती शिवाजी महाराजांच्या पारिपत्याकरता धाडला होता.

देवद्वेष्टा अफझल खान स्वराज्यात शिरला. येताना त्याने तुळजापूर आणि पंढरपूरला उपद्रव केला, महाराजांच्या लहानशा राज्यात त्याच्या फौजा तळ ठोकून बसल्या. पुढे युक्ती-प्रयुक्तिने आणि अतुलनीय शौर्य-धैर्याने महाराजांनी खानासारीखा दुर्योधन मारिला. आदिलशाहीचा सैन्यसागर महाराजांच्या पराक्रमी सेनेने एका आचमनी पिउन टाकला. अहद तंजावर तहद पेशावर राजियांच्या पराक्रमाचे डंके वाजले. स्थिरबुद्धी महाराजांनी खानाच्या मृत्यूनंतर त्याच्या शीर आणि धडाचं यथाविधी दफन करवलं आणि तिथे एक लहानशी कबर बांधली गेली.

या गोष्टीला साडेतीनशे वर्षं उलटली. आज त्या स्थळी, त्या कबरीवर एक दर्गा उभारला गेला आहे आणि अफझल खानाला सुफी संत म्हणून त्याला नवस बोलणे आणि त्या पीराचे उरूस भरवणे असले प्रकार चालू आहेत. त्याला नवस बोलणारे धन्य, आणि नवसाला पावणारा खान धन्य! तो दर्गा हटवण्यासाठी प्रयत्न करणारे आज असहिष्णू (सध्याचा आवडता शब्द) आणि टोकाची भूमिका घेणारे ठरवले जात आहेत. अफझल पूजेचा हा असाध्य रोग.


२००१ मध्ये अजून एक अफझल अवतरला. एक फुटीर, दहशतवादी. भारतीय संसदेवर जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा च्या अतिरेक्यांनी जो हल्ला चढवला त्या कटाचा हा सूत्रधार. २००२ साली या अफझलवर खटला सुरु झाला आणि तीन वर्षांच्या तपासण्या, चौकशा आणि साक्षीपुरावे यांच्या आधारे त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला तो २०१३ मध्ये फेटाळला गेला आणि ९ फेब्रुवारी २०१३ रोजी तिहार तुरुंगात या अफझलचा अंत झाला. फाशीची शिक्षा हवी का नको याचा उहापोह आपण नंतर करू. वैयक्तिक मत पहायचं झालं तर मी स्वत: देहांत शिक्षेचा पुरस्कर्ता नाही. पण आज या देशाचा कायदा दुर्मिळ अशा गुन्ह्याला फाशीची शिक्षा देतो. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने पुढीलप्रमाणे मत व्यक्त केलं आहे-

"In the instant case, there can be no doubt that the most appropriate punishment is death sentence. That is what has been awarded by the trial Court and the High Court. The present case, which has no parallel in the history of Indian Republic, presents us in crystal clear terms, a spectacle of rarest of rare cases. The very idea of attacking and overpowering a sovereign democratic institution by using powerful arms and explosives and imperiling the safety of a multitude of peoples' representatives, constitutional functionaries and officials of Government of India and engaging into a combat with security forces is a terrorist act of gravest severity. It is a classic example of rarest of rare cases.
The gravity of the crime conceived by the conspirators with the potential of causing enormous casualties and dislocating the functioning of the Government as well as disrupting normal life of the people of India is some thing which cannot be described in words. The incident, which resulted in heavy casualties, had shaken the entire nation and the collective conscience of the society will only be satisfied if the capital punishment is awarded to the offender. The challenge to the unity, integrity and sovereignty of India by these acts of terrorists and conspirators, can only be compensated by giving the maximum punishment to the person who is proved to be the conspirator in
this treacherous act. The appellant, who is a surrendered militant and who was bent upon repeating the acts of treason against the nation, is a menace to the society and his life should become extinct. Accordingly, we uphold the death sentence."
CASE NO.: Appeal (crl.) 373-375 of 2004 PETITIONER: STATE (N.C.T. OF DELHI)
RESPONDENT: NAVJOT SANDHU@ AFSAN GURU
DATE OF JUDGMENT: 04/08/2005
BENCH: P. VENKATARAMA REDDI & P.P. NAOLEKAR
JUDGMENT:
JUDGMENT WITH CRIMINAL APPEAL Nos. 376-378 OF 2004 STATE (N.C.T. OF DELHI) 05 APPELLANT VERSUS SYED ABDUL REHMAN GILANI 05 RESPONDENT CRIMINAL APPEAL Nos. 379-380 OF 2004 SHAUKAT HUSSAIN GURU 05 APPELLANT
VERSUS STATE (N.C.T. OF DELHI) 05 RESPONDENT CRIMINAL APPEAL NO. 381 OF 2004 MOHD. AFZAL 05 APPELLANT
VERSUS
STATE (N.C.T. OF DELHI)

(IBN live वरून)

याठिकाणी दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे, देहांत शिक्षा ही नैतिक अथवा सामाजिक दृष्ट्या अमानवी असली तरी आपल्या देशाचा कायदा ते सर्व मान्य करून देखील देहांत शिक्षा तशीच ठेवतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला ही शिक्षा देण्यात येते त्याला त्या शिक्षेविरोधात दाद मागण्याच्या सर्व संधी दिल्या जातात आणि अतिशय काटेकोर तपासणी आणि चौकशीनंतरच ही शिक्षा कायम केली जाते. त्यामुळे माझ्या मते कोणालाही दिलेल्या फाशीच्या शिक्षेच्या नैतिकतेवर संशय घेणं म्हणजे आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उमटवण्या सारखं आहे. अफझल गुरु हा माणूस न्यायालयात अनेक टप्प्यांवर दोषी सिद्ध झाला. त्याचा या कटातला सहभाग न्यायालयाने सिद्ध केला आणि परिस्थितीजन्य पुरावे तपासून आणि तब्बल तीन वर्षांच्या प्रक्रियेनंतर ही शिक्षा कायम केली गेली. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रपतींनी गृह मंत्रालयाशी सल्ला मसलत करून या माणसाचा दयेचा अर्ज फेटाळला. या सर्व प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालय ते राष्ट्रपती हे सर्व सहभागी होते. त्यामुळे अफझल या प्रकारात गोवला गेला आणि त्याला शिक्षा झाली ते चुकीचं झालं म्हणून ऊर बडवण्यात काहीच अर्थ नाही, कारण त्याला फाशी द्यावी ही आपल्यासारख्याच जनतेची इच्छा होती. तो काश्मिरी होता म्हणून हा प्रश्न काश्मिरी लोकांच्या अस्मितेचा वगैरे आहे हे म्हणणं देखील अयोग्य आणि नाटकी ठरतं. याच निकालपत्रात सर्वोच्च न्यायालयाने तपासात झालेला ढिसाळपणा आणि चुकांवर बोट ठेवलं आहे. अफझल विरुद्धचे पुरावे हे परिस्थितीजन्य असले आणि त्याला निवडणुकांच्या तोंडावर फाशी देण्यात राजकीय स्वार्थ असला तरी या माणसाने संसदेवर हल्ला करणा-या अतिरेक्यांना दिल्लीत आणलं ही गोष्ट विसरता येत नाही. 


हे सर्व मी सांगतो आहे कारण गेल्या काही दिवसात मला अस्वस्थ करणा-या अनेक घटना घडल्या. आपल्या समाजापुढे आणि आपल्या मानसिकतेपुढे आरसा धरावा अशा या गोष्टी.
९ फेब्रुवारी २०१६ रोजी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अफझल गुरूच्या फाशीला तीन वर्षं पूर्ण झाल्यामुळे एक कार्यक्रम आयोजित केला गेला आणि या कार्यक्रमात भारत विरोधी घोषणा दिल्या गेल्या. आता दोष कुणाकडेही असला तरी या घोषणा दिल्या गेल्या हे सत्य आणि या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या हे पण सत्य. सरकारने यावर प्रतिक्रिया म्हणून विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमारला अटक केली आणि पोलिसांनी देशविरोधी हालचालींच्या तपासाकरता पूर्ण विद्यापीठ पिंजून काढलं. काही वाचाळ नेत्यांनी आगजाळ प्रतिक्रिया दिल्या. गृहमंत्र्यांनी या सर्व प्रकाराला कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याचा पाठींबा असल्याचं सांगितलं. कन्हैय्या कुमारवर जिथे खटला चालू होता त्या कोर्टाच्या आवारात काही विद्यार्थी, कम्युनिस्ट नेते आणि पत्रकारांना मारहाण झाली. एकंदरीत प्रकरण चिघळलं.

मी शिक्षक आहे, आणि मी गेली सात वर्षं शिकवतो आहे. विद्यार्थी कसे असतात आणि ते कसा विचार करतात हे मी पाहिलं आहे. हा प्रकार मला अस्वस्थ करून गेला, आणि त्यामुळे मी राजकारणावर लिहित नसलो तरी आज मला माझे विचार मांडावेसे वाटले. मी असंही सांगतो की हे माझे वैयक्तिक विचार आहेत आणि याचा किंवा माझा कुठल्याही राजकीय वा धार्मिक  विचारसरणीशी संबंध नाही. मी मोदींचा भक्त नाही, द्वेष्टाही नाही. मी एक सामान्य शिक्षक आहे आणि त्याच भूमिकेतून मी या प्रकारचा उहापोह करणार आहे.

आता पहिला प्रश्न हा उद्भवतो की अफझल गुरु मेल्याच्या तारखेलाच या विद्यार्थ्यांनी सभा का घ्यावी? अफझल गुरूला फाशी दिली तेव्हा, तीन वर्षांपूर्वी हे काय झोपले होते? आज जे पुढारी या विद्यार्थ्यांचं समर्थन हिरीरीने करत आहेत, ते त्यावेळी सत्तेत होते आणि कदाचित निवडणुकांवर नजर ठेवून या लोकांनी अफझल गुरूची फाशी उरकली. एक वेळ हा भाग आपण बाजूला ठेवूया. अफझल गुरु आज ना उद्या फासावर लटकणार होताच तो कदाचित लौकर लटकला. पण तेव्हा हे विद्यार्थी गप्प का होते? आणि जो माणूस भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार होता, त्याला फाशी दिली म्हणून यांनी गळा का काढावा? लक्षात घ्या, इथे प्रश्न फाशी असावी कि नसावी हा नसून 'अफझल गुरु' या माणसाला फाशी का दिली हा आहे. "तुम कितने अफझल मारोगे, हर घरसे अफझल निकलेगा" ही घोषणा जेव्हा दिली जाते, तेव्हा त्याचा उद्देश देहांत शिक्षा रद्द करावी असा उदात्त नसून नको त्या जागी आपल्याला झालेल्या अफझल पूजेच्या रोगाची जाहिरात करणं हा आहे, यात शंका नाही. "इंडिया, गो बॅक", "काश्मीर कि आझादी तक जंग चलेगी", या आणि तत्सम घोषणा ज्या देशात आपण राहतो आणि ज्या देशातल्या नागरिकांनी भरलेल्या कराच्या पैशातून आपल्याला स्वस्त शिक्षण, अन्न, आणि निवारा दिला जातो त्याच देशाच्या एकंदरीत विरोधात आहे हे माहित असतानाही हा प्रकार कसा काय घडू शकतो? घटनेचं १९वं कलम सर्व नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतं. पण या स्वातंत्र्यासोबत जबाबदारी येते याची जाणीव कुणी ठेवायची? मला हा सर्व प्रकार अत्यंत बेजबाबदार आणि कृतघ्नपणाचा वाटतो. हा बेजबाबदारपणा येतो कुठून?

आजकाल आपल्या देशात एका विशिष्ट प्रकारच्या विचारवंतांची चलती आहे. यांना आपण पुरोगामी असं म्हणतो आणि या नावाचा यांनाही अभिमान वाटतो. कुठल्याही प्रस्थापित व्यवस्था आणि निर्णयांच्या विरोधात जाऊन बोललो म्हणजे आपण आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते झालो अशी यांची समजूत असते. मातकट रंगाचे कुडते, साड्या, काळपट दागिने, फ्रेंच दाढी किंवा पोनीटेल, स्त्री असल्यास कपाळावर प्रचंड मोठी टिकली असा जामानिमा केला आणि कुठल्याही गोष्टीचे-अगदी स्वत:ला काल झालेल्या बद्धकोष्ठाचेदेखील खापर सरकारवर फोडले म्हणजे लोक आपल्याला पुरोगामी समजतील अशी यांची समजूत असते का? नेहरू विद्यापीठात अफझल गुरुचे उदात्तीकरण झाल्यावर पहिले धावले ते हे लोक. याकुब मेमनला फाशी दिली तेव्हा गळा काढून रडले ते हेच लोक. जेव्हा याकुब किंवा अफझल तुरुंगात सडत होते तेव्हा या लोकांच्या कुडत्यावरची माशीही हलली नाही, पण जेव्हा त्यांना फाशी दिली गेली, किंवा अफझलचे उदात्तीकरण झाले आणि देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या तेव्हा यांची स्वातंत्र्य आणि मानवतेबद्दलची कळकळ सारे बांध फोडून वाहू लागली. नेहरू विद्यापीठात परवा जेव्हा काश्मीर हा भारताचा भाग नाही आणि भारताचे तुकडे होतील अशी भाषा केली गेली तर तुमच्या बापाचे काय गेले असा प्रश्न विचारणारे विद्यार्थी, अफझल गुरूचा फोटो घेऊन काश्मीर भारतापासून फुटला पाहिजे हे बोलणारे विद्यार्थी हे याच पुरोगाम्यांच्या पिलावळीचा भाग आहेत.

या सर्व प्रकारात पोलिस विद्यापीठात घुसले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना अटक केली. आता यावर खटला सुरु आहे. गेले दोन दिवस न्यायालयाबाहेर विद्यार्थी आणि पत्रकारांना मारहाण करण्यात आली. या विद्यार्थ्यांना गोळ्या घालाव्यात अशी कंठाळी वक्तव्यं केली गेली. जेएनयु बंद करा अशी मागणी सध्या जोर धरते आहे.  प्रश्न असा पडतो की देशभक्ती म्हणजे काय अशी आपली कल्पना आहे? जेएनयु मधल्या विद्यार्थ्यांना आणि पत्रकारांना न्यायालयाबाहेर बडवणं, किंवा त्यांना गोळ्या घालण्याची भाषा करणं हा आक्रस्ताळेपणा झाला. याला आपण देशभक्ती म्हणतो का? आपला राष्ट्राभिमान आपल्याला आपल्या संविधानाचापण अभिमान शिकवतो का? जे या प्रकारात दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण त्यांना दोषी सिद्ध करणं आणि त्यांना शिक्षा देणं हे आपल्या न्यायव्यवस्थेचं काम आहे असं आपल्याला वाटत नाही का? की आपणच आपल्या देशप्रेमाबद्दल ऊर बडवून बोलणं ही आपल्याला देशभक्ती वाटते?  १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी यादिवशी किंवा एखादा लान्स नाईक हनुमंतप्पा मारला गेला की आपल्याला आपण भारतीय असल्याची जाणीव होते आणि या देशावर प्रेम देखील केलं पाहिजे याची आठवण होते. १६ ऑगस्ट आणि २७ जानेवारीला हा ताप उतरूनदेखील जातो. आपल्या पुढच्या पिढीला आपण एकतर असे आक्रस्ताळे किंवा नको त्या वेळी स्वातंत्र्याचा पुळका येणारे खोटे पुरोगामी बनवणार आहोत का? 

या विद्यार्थ्यांना जे शिक्षण मिळतं त्याबद्दल आपण विचार करतो का? आपल्या विद्यापीठांत काय शिकवलं जातं आणि आपण वर उल्लेखिलेल्या खोट्या विचारवंतांची एक पिढी निर्माण करत आहोत का याचा विचार करणं आवश्यक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे देशाचे तुकडे करण्याच्या किंवा अफझल सारख्या क्षुद्र डबल एजंटच्या उदात्तीकरणाच्या घोषणा देणं नाही, किंवा पुरोगामी विचार म्हणजे दरवेळी सरकारवर कोरडे ओढणं आणि भारत हा कसा असहिष्णू देश आहे हे पदोपदी सांगणं नाही याची जाणीव या मुलांना आणि तथाकथित विचारवंतांना व्हायला हवी. त्याच जोडीला देशप्रेम आणि देशभक्ती हा आक्रस्ताळेपणा नसून ती एक मोठी विचारशृंखला आहे याचं शिक्षण ही आजची गरज आहे. झाला प्रकार हा निश्चितच लाजीरवाणा आहे. आपले विद्यार्थी कुणाच्या शिकवण्याने आणि कसला विचार करून हा घृणास्पद प्रकार करू शकतात याचं आत्मपरीक्षण हा एक भाग झाला. अशा परिस्थितीला सामोरे जाताना आपण कसे वागत आहोत याचा विचार हा दुसरा. आपल्या विचारसरणीचे आदर्श काय आहेत आणि आपण आपल्या समाज आणि देशाबद्दल काय विचार करतो याचं परीक्षण करण्याइतका तरतमभाव आपल्यात आहे का हा आजचा खरा प्रश्न आहे. कुठलाही विचार स्वीकारताना आपण तो शिकत आहोत का त्याच्या आहारी जात आहोत याची नीरक्षीरविवेकबुद्धी आणि तारतम्य असणं ही आपल्या समाजाची गरज आहे, आणि मला वाटतं जोपर्यंत आपल्या आचारविचारात आलेला दिखाऊपणा आणि बाजारूपणा तसाच राहील, तोपर्यंत ही गरज पूर्ण होणार नाही.   

 

Sunday, November 8, 2015

परत एकदा मौज :)

यंदाचा मौज दिवाळी अंक अवश्य वाचा. एक म्हणजे मुखपृष्ठापासून अंक अतिशय सुरेख आहे (मौज standards!), आणि माझा लेख यावेळी चक्क तिसरा आहे त्यात! 'द्वारकेचा गरुडध्वज' असं लेखाचं शीर्षक आहे आणि द्वारका का आणि कशी बुडाली याची भूशास्त्रीय कारणं आणि त्याच्या इतिहासातल्या पाऊलखुणा असा लेखाचा विषय आहे.
कळावे, लोभ असावा! :)   

Saturday, March 14, 2015

भला हुआ मोरी गगरी फूटी...


बाहेर धुकं दाटलं आहे. हातात कॉफीचा कप घेऊन मी माझ्या खिडकीशी बसलो आहे. आणि तू इथे नाहीस.
तुला पत्र लिहितो आहे खरं, पण ते तुला न कळणा-या भाषेत. ज्या माध्यमाकडे तू आजवर पाहिलंही नसशील, त्या माध्यमातून. यातल्या कित्येक गोष्टी तुला सांगितल्या आहेत का मी? आपण बोलत असताना? एखाद्या किल्ल्याच्या माथ्यावर? समुद्राकाठी? तुला आठवत असतील ब-याच गोष्टी.  मग हे पत्र तुला आहे, हे तरी का म्हणायचं? स्वत:शी बोलायची सवय तुला भेटलो तेव्हापासून तर अधिकच वाढली आहे. मग जे काही सांगायचं आहे, ते तुला सांगायचा अट्टाहास तरी कशाला? तू तरी जवळ आहेस का माझ्या?
काही दिवस होऊन गेले, पण अजूनही आठवतं. त्या मध्यरात्री माझ्या दाराशी आलीस ते जाते म्हणून सांगण्यासाठी. पुढचा रस्ता मला एकट्याने चालायचा आहे आणि तू केवळ साक्षीदार म्हणून राहशील-राहणार नाहीस कदाचित हे सांगण्यासाठी. डोळ्यात पाणी आणायचं नाही हे सांगून तू निघून गेलीस आणि आता तू भेटशील, पण सारंच अवघड होऊन बसेल तेव्हा. कदाचित तू परत नाही भेटणार. रस्ते वेगळे झाले आणि आपण आपली आयुष्यं वेगवेगळी जगायला सुरुवात केली. धुक्यात गेलेल्या भूतकाळात अजून एक जमा झाली ती तुझी सावली.
कित्येक गोष्टी नकळत घडून जातात, आणि काळाच्या ओघात आपल्याच आयुष्याकडे आपल्याला तटस्थपणे बघायला नाही मिळत.     
सरकारी नोकरी सुटली, त्याला आता दोन वर्षं होतील.
कलकत्त्यात काढलेल्या एका वर्षाच्या खुणा अजूनही शरीर-मनावर आहेत. घरापासून तीन हजार किलोमीटर दूर, एकट्याने घालवलेल्या संध्याकाळच्या वेळा अजून दिसतात कधीकधी. आजही घर-दार जवळ आहे अशातला भाग नाही. किंबहुना जितकी ओढ गेली काही वर्षं होती, तितकी आता नाही वाटत.  बंगाली बोलायची सवय कधीच सुटून गेली. गेल्या दोन वर्षात अनेक मित्र जोडले. बघता बघता सारे दूर निघून गेले. निरोप घेताना लहान मुलासारखे डोळे पुसणारे माझे मित्र..आता क्वचित बोलणं होतं, होत नाही. सगळेच अर्थ बदलत चाललेत का आता? त्या शहराशी, त्या जागेशी, तिथे जगलेल्या आयुष्याशी जोडलेले  धागे एक एक करून तुटत चालले आहेत आणि सगळा भूतकाळ आता धूसर दिसू लागला आहे.
एक नोकरी सोडून दुसरी नोकरी पत्करली. माझ्यावर प्रेम करणारी शेकडो मुलं आणि घरापेक्षाही आपलंसं वाटणारं माझं डीपार्टमेंट. बघता बघता सगळे सूर कसे छान जुळून आले. वाटलं कि इथे आता समाधान मिळेल. काहीतरी केल्याची परिपूर्ण भावना. आयुष्याचा उद्देश सापडल्याची तृप्ती...तुझी भेट झाली...जशी वाट फुटेल तसं वाहत गेल्यासारखं का वाटत गेलं मग? सतत असमाधानी असल्याचा हा कसला शाप होता आपल्याला? सततची धावपळ, तगमग, सतत काही ना काही मागत राहणारं आयुष्य. एक दोन दिवस शांतपणे अंग टाकून पडून राहावं एवढी इच्छाही पूर्ण न होऊ देणारं हे सतत धावतं शहर. आणि आज आपण एकमेकांचा निरोप घेतला तो शेवटचा.
परत एकदा तुला सांगतो, दोन वर्षं हा काही मोठा काळ नाही. तुझ्या आठवणींच्या खुणा अजूनही मनावर तशाच आहेत. मी हसतो, खेळतो, खूप शिकवतो आणि वाचतो, पण खोल कुठेतरी तुझ्या स्मरणांच्या दाट सावल्या हलून जातात कधीतरी. पुन्हा शरीरावर आणि मनावर त्याच आणि तशाच खुणा. काळ बदलतो आहे का मला? गेल्या दोन वर्षांत वाढत गेलेल्या आणि बदलत गेलेल्या अनेक जबाबदा-या, बदलत गेलेली नाती, नात्यांचे अर्थ. अपेक्षांची नसती ओझी.  सतत काहीतरी मागतच राहायचं का आयुष्याकडे? परत दोन वर्षांनी मी माझं नवीन घर बघतो, तेव्हा कितीतरी कचरा पुन्हा साचलेला दिसतो. हे का होतं? चालत्या चक्कीमध्ये आपण पुन्हा पुन्हा का भरडून निघतो? कितीतरी प्रश्न आणि त्यांची न सापडणारी उत्तरं. जर का ती न सापडणारी आहेत तर शोध घ्यायचा तरी कशाचा? हे जे काही मी आत्ता लिहितो आहे त्यात ही उत्तरं शोधायचा उद्देश अजिबात नाही. परत एकदा मनात जमा झालेलं सारं काही ओकून टाकावं झालं. परत कोणीतरी बघेल हे सगळे तुकडे. आयुष्याने भीक घातलेले. कधी मी मागितले म्हणून, कधी त्याला द्यावेसे वाटले म्हणून. तू बघशील कदाचित, पण तुला समजेल का? हे सारं काही तुला सांगितलेलं आहे मी.
नाती कशी बदलत जातात ना? कालपर्यंत एकमेकांशिवाय एक क्षणही न राहू शकणारे आपण आज मैलोनमैल दूर गेल्यासारखे. या सबंध वर्षात सारे बंध तुटल्यासारखं वाटणारं माझं घर आज परत माझ्या पाठीशी आलं, अभंगपणे नाही तरीही. कलकत्त्यात असताना हवाहवासा वाटणारा एकुटवाणेपणा, पण आज त्याचे सगळे अर्थच बदलून गेले. गेली दोन वर्षं या प्रचंड गतिमान शहरात कशी गेली ते समजलंच नाही. पण परवापरवापर्यंत घाम आणि उकाड्याने जीव नकोसं करणारं हे शहर कवचकुंडलांसारखं अंगाला बिलगून बसलं.
 नाती कित्येक वेळा अशी असतात की ती सोडून दिल्यावरच जास्त सुख होतं. कित्येक वेळा आपण केवळ आपल्या समाधानासाठी गोष्टींना चिकटून बसतो आणि मग तिथून तुटून निघताना होणा-या अपरिहार्य वेदना सोसाव्या लागतात.
नातं संपतं म्हणजे काय होतं? आपला संवाद संपतो आणि मुख्य म्हणजे तो संपला आहे याची जाणीवही होत नाही. आयुष्यातला तो काही काळ असा एकाएकी संपणार आहे याची जाणीव होत राहिली मला, पण मग हळूहळू त्या जाणीवेतल्या वेदना कमी होत गेल्या. आज आयुष्यातलं एक नातं संपल्याचा सल सोडून तू गेलीस आणि एकट्याने आयुष्य जगायचं आहे याची जाणीव झाली मला. पण या जाणीवेला वेदनेची जोड नव्हती.
आजवर अनेक जण आयुष्यात आले. मित्र, मैत्रिणी, शिक्षक, गुरु आणि अनेक जण. प्रत्येक नातं सहजपणे आलं आणि जेव्हा ते संपायची वेळ आली तेव्हा ते सहजपणे संपलं देखील. जी नाती आयुष्यभर सोबत राहतील असा विश्वास होता ती नाती अखेरपर्यंत सोबत राहतील कदाचित पण आयुष्याला कोणीच पुरलेलं नाही याची जाणीव या वेळेला होऊन गेली. आपलं नातं संपताना सर्वात मोठं देणं देऊन गेलं ते हे. या जाणिवेचं.
अनेक संतांच्या, कवींच्या काव्यात मरणाचे मोठे सुंदर उल्लेख येतात. कधी चोला बदलला जातो, कधी माहेराहून सासरी रवानगी होते आणि कधी कधी मैली चुनरी घेऊन आपण आपल्या माहेरच्या दारी येऊन उभे राहतो. मातीचं शरीर, त्यात सतत भरली जाणारी पाप-पुण्यं आणि तो सतत रिकामा होणारा घडा. ती सतत फिरणारी माळ आणि त्यावर केलेला तोच तोच जप. तशीच गत आपल्या नात्यांची असते ना? सगळे मातीचे नातेसंबंध आणि त्यात भरल्या जाणा-या अनेकानेक गोष्टी. कबीर म्हणतो,
"भला हुआ मोरी गगरी फूटी, मैं पनियां भरन से छूटी
मोरे सिर से टली बला ।।
चलती चाकी देखकर दिया कबीरा रोए
दो पाटन के बीच यार साबुत बचा ना कोए ।।
चाकी चाकी सब कहें और कीली कहे ना कोए
जो कीली से लाग रहे, बाका बाल ना बीका होए ।।"
जर का भांडं फुटून गेलं तर त्यात पाणी भरायचा उद्योग का म्हणून करायचा? जर का माळ तुटून गेली तर तोच तोच जप का करत राहायचा? आणि चाकीमध्ये भरडून निघण्यापेक्षा जात्याच्या दांडीला धरून राहिलं तर काय वाईट?
थोरोने लिहिलं आहे कि त्याने बांधलेल्या घरात त्याने काही विशिष्ट आकाराचे धोंडे आणून ठेवले, केवळ चांगले दिसावेत म्हणून. पण मग त्यांच्यावर धूळ जमा व्हायला लागली, मग ते स्वछ करण्याचं काम आलं. त्याची काळजी घेणं आलं. थोरो म्हणतो की मुळात ज्याची गरज नाही अशा किती वस्तू आपण उगीच गोळा करत राहतो? ज्या नात्यांचा आयुष्याला भार होतो अशी नाती का उगीच वागवत राहतो आपण? झेन विचारदेखील सुरु होतात ते मुक्त होण्यापासून. ज्याची आयुष्याला गरज नाही, जे भार झालेलं आहे ते जाऊ देण्यापासून. मग त्या सवयी असोत, घरात साचलेला पसारा असो किंवा नातेसंबंध असोत. बुद्ध म्हणतो तसं कमळाच्या पानावर पडलेल्या थेंबासारखं अलिप्तपणे आपलं आयुष्य जोखण्याची सुरुवात मुक्त होण्यापासून होते.
कित्येक गोष्टी हातातल्या नसतात आणि कित्येक गोष्टी आपल्यासाठी नसतात. त्याची जाणीव फक्त उशिरा होते. कबीराची महाठगिनी माया अशी काही गुंतवते कि ती माया आहे आणि तिची आपल्या आयुष्यात गरज नाही हे लक्षात यायला पण खूप वेळ लागतो. परत एकदा हे सारं चक्र फिरून त्या अकथ कहाणीकडे येतं. ती पूर्ण होतेच असं नाही. जे मागू ते मिळेलच असंही नाही. पण मागितल्याचं समाधान मात्र आपल्या गाठीशी राहतं. तेवढं झालं तरी खूप झालं.

Saturday, June 7, 2014

मल्हार ..



संध्याकाळची वेळ आहे. गर्दीने लोकल भरलेल्या.
जनांचा प्रवाहो एकाच दिशेने वाहतो आहे.
जिकडे पाहावं तिकडे गर्दी.
शेवटचं लेक्चर संपवून मी बाहेर येतो.
कॉलेज संपवून आलेले अनेक विद्यार्थी बघता बघता समोरच्या प्रवाहात उड्या घेतात.
मागोमाग मीपण.
घराच्या ओढीने वाहणारा लोंढा माझ्या अंगावरून जातो.
अनेकजण धक्के देणारे.
मला ढकलणारे सहस्त्र हात..
बघता बघता एका लोकलमध्ये मी ढकलला जातो.
दिवसभराचा ताण, थकवा.
पूर्ण न झालेल्या अनेक अपेक्षांची गाठोडी....
बोलून बोलून कोरडा पडलेला घसा.
भोवताली झोपड्या, घाण, कचरा, दर्प.
धक्के देणा-या अनेकांवर राग..
मुंबईचा उकाडा.

मी माझा फोन बाहेर काढतो, इयरफोन कानात घालतो आणि डोळे मिटून घेतो.
तानपुरे झंकारु लागतात.
पाठोपाठ तुमचा बुलंद, भरीव षड्ज...
कोमल निषादावर तुम्ही विसावता आणि धैवताला स्पर्श करता हलकेच.
दोन निषादांचा नाजूक तोल.

तुम्ही मिया कि मल्हार गाताय, भीमण्णा.
"करीम नाम तेरो, तू साहेब सतार....."
निषादावरची तुमची वजनदार सम. पावसाचा पहिला थेंब पडावा तशी.
ढग दाटून यावेत अशी अस्वस्थ करणारी आलापी.
रिषभ-पंचमांचा सुरेख संवाद, अंगावर काटा येईल असा खर्ज.
"दुख दरिद्र दूर कीजे, सुख देहो सबनको...
सदारंग बिनती करत हो, सुन लिजो करतार"
मनातले अनेक हळवे कोपरे जागे होतात. मिटले डोळे भरून येतात.
अनेक प्रार्थना, अनेक अपेक्षा...
अनेकवेळा पसरलेला पदर..
कुठे घेऊन चाललेत हे सूर मला?
का माझिया मीपणाची जाणीव विरते आहे?
इथे कोणी नाही आता.
राग नाही, थकवा नाही
कबीर म्हणतो तसा कुठलाच पसारा नाही.
मी आहे, तुमचे सूर आहेत आणि माझा 'साहेब सतार' आहे....
मला नाही जायचं आता कुठे.

मी उतरतो. घरापासून दूर? असेन कदाचित.
काळे ढग भरून आलेले आहेत. पावसाचा अनाहत नाद चालू आहे.
मी भिजत चालू लागतो.
सबाह्य अभ्यंतरी भिजवून टाकणारा पाऊस.
रस्ते मोकळे आहेत, मी भिजतो आहे आणि तुम्ही गात आहात अण्णा.
फक्त माझ्यासाठी.

तुम्ही गेलात तेव्हा मी हजारो मैल दूर होतो.
रात्री एक मित्र म्हणाला, "पुण्याचं वैभव गेलं हो…"
आणि मी लहान मुलासारखा रडलो.
सवाई गंधर्वमध्ये जेव्हा तुम्ही शेवटचं गायला होतात,
तेव्हा स्तब्ध झालेल्या हजारो लोकांत मी तुमच्याकडे डोळे लावून बसल्याचं आठवतंय.
आज इथे, पाऊस पडताना, फार जाणवतं की आता फक्त तुमचा आवाज राहिला  आहे.
सारं काही विसरून टाकायला लावणारा.
पाऊस कोसळतोच आहे....
तुम्ही गात आहात, अण्णा.
कायमचे.
दिवसाच्या, ऋतूंच्या प्रत्येक चक्रात.
मैफल संपली तरीही.

Saturday, November 9, 2013

अम्बितमे नदितमे देवितमे सरस्वती

यंदाचा मौज दिवाळी अंक अवश्य वाचा. "अम्बितमे नदितमे देवितमे सरस्वती" हा माझा  पहिलावहिला  लेख मौजेत प्रकाशित झाला आहे! सरस्वती नदी आणि तिच्या लुप्त होण्यामागची भूशास्त्रीय कारणं असा लेखाचा विषय आहे. काही दिवसांनी जमलं तर लेखाची प्रत ब्लॉगवर अपलोड करतो.

Tuesday, October 16, 2012

हंस अकेला (भाग दुसरा)


आधीचा भाग इथे पहा.
पहिला भाग लिहून झाला आणि त्यानंतर बरेच दिवस आळसात गेले. मध्यंतरी मीही सरकारी नोकरी सोडून मुंबईमधे स्थलांतर केलं. या भानगडीत लिहायला मस्त उशीर होत गेला. त्यामुळे झालेल्या उशिराबद्दल निर्लज्जपणे काहीही न लिहिता थेट मुद्द्याला हात घालतो.
मी कलकत्त्याहून मुंबईमध्ये आलो, तेव्हा माझ्या नशिबाने मुकुल शिवपुत्र यांनी पुण्यात दोन अविस्मरणीय मैफली केल्या. पहिल्या मैफिलीतल्या सावनी, सावनी नट, बिहाग आणि दुस-या मैफलीमधला शिवकेदार आणि चंद्रकंस यांची धुंदी अजूनही उतरत नाहीये. या दोन्ही मैफलीत बुवा जे काही तब्येतीत गायले आहेत, की क्या कहे!  पार झपाटून टाकणा-या दोन बैठकी. आधी जे काही लिहायचं ठरवलं होतं, ते पार विसरून गेलो.
आकुर्डीला झालेल्या मैफलीत मुकुलजी सावनी बिहाग, सावनी, सावनी नट गायले. त्यानंतर त्यांनी मारुबिहाग मधलं भजन सादर केलं. मैफलीचा समारोप करताना त्यांनी महाकवी जयशंकर प्रसाद यांची (स्वत: संगीतबद्ध केलेली) कविता सादर केली.
"बीती विभावरी जाग री!
          अम्बर पनघट में डुबो रही-
         तारा-घट ऊषा नागरी।
खग-कुल कुल-कुल-सा बोल रहा,
किसलय का अंचल डोल रहा,
          लो यह लतिका भी भर ला‌ई-
          मधु मुकुल नवल रस गागरी"
कालिदासाच्या प्रतिमासृष्टिची आठवण करून देणारी ही कविता. जयशंकर प्रसाद यांच्या रचना भाषासौष्ठव, उपमा यांच्यादृष्टीने वेगळ्या समजल्या जातात. या कवीच्या कविता आजकाल अभावानेच वाचायला-ऐकायला मिळतात (माझ्या हिंदीच्या दिव्य वाचनात तर नाहीच!). सुरेख शब्द, आणि भैरवीचा हुरहुर लावणारा स्वरसाज. इतकं साजरं गारुड यापूर्वी खूप कमी वेळा ऐकायला मिळालं आहे. तशीच पुण्याला सहा वर्षांपूर्वी गायलेली भैरवी. हीरचे करूण शब्द. "मैंदा बिछड़ा यार मिलांदा.." आणि भैरवीचे सूर. अजूनही ही भैरवी ऐकली की पाणी येतं डोळ्यात.
मुकुलजींचे साथीदार म्हणतात की आजवर कुठल्याही दोन मैफलीत मुकुलजी एकच भैरवी गायलेले नाहीत.आणि विचार केला तर लक्षात येतं की हे खरं असावं. मी आजवर ऐकलेल्या मैफिलींमध्ये खरंच एक भैरवी परत ऐकलेली नाहीये. आणि बंदिशींचा पट केवढा मोठा. कबीरापासून कुमार गंधर्वांपर्यंत. कुमारजींच्या बंदिशी साहजिकच जास्त वेळा ऐकायला मिळतात, पण त्यांच्या जोडीला हीर, सूरदास, तुलसीदास, माळवी लोकधून आणि अनेक पारंपारिक बंदिशीपण ऐकल्यात.
आत्ता लिहिताना मी प्रामुख्याने दोन-तीन बंदिशी समोर ठेवून लिहिणार आहे. या मुकुल शिवपुत्र यांच्या संस्कृत रचना आहेत. त्यानंतर आपण बाकीच्या पैलूंचा विचार करू.
पहिली बंदिश मी एकदा पुण्यात ऐकली, तेव्हा ती भैरवमधे स्वरबद्ध होती. नंतर अहमदाबादेत हीच बंदिश मी श्री मध्ये ऐकली. आणि नंतर ही श्री मधेच स्वरबद्ध झालेली दिसते, आणि भैरवपेक्षा श्री या रचनेच्या रसपरिपोषासाठी जास्त योग्य वाटतो. मध्यलय रूपक मधली ही रचना आहे. 
'जगतमंगलभंगकृत सन्मंगलप्रद पालय शिवतनय हेरम्ब
पार्वतीप्रियबालक गजमुख गिरिजनुत दितिजान्तक, गणनायक 
वरदपाशसुमोदकांकुशविधृत सिंदुरांग शुभकर पालय, शिवतनय हेरम्ब(...)
मामनन्यगतिम्, प्रसीदमतिम् प्रबोधकरी सुवाक्पटुताम् महि देहि 
निर्विघ्नकरी परमोदारनामस्वकम्पकम कुरु पालय शिवतनय हेरम्ब'
जगातील अमंगल भंग करणा-या, मंगलप्रद अशा हे शिवतनय हेरम्बा, आमचे पालन कर, तूच माझी एकमेव गती आहेस, मजवर कृपा कर आणि मला वाक्पटुत्व दे, निर्विघ्नता दे  अशा अर्थाची ही रचना आहे. एखाद्या जुन्या संस्कृत काव्याचा भास व्हावा असे समास आणि संबोधने यांनी अजूनच समृद्ध झालेली ही रचना.

दुसरी बंदिश श्याम कल्याण मधली, मध्यलय त्रितालात बांधलेली आहे.
'कल्याणी कल्याणकरी, जय काली कल्याणकरी
जय श्यामा कल्याणकरी, जय गौरी कल्याणकरी
श्रीदशमुख दशकर दशसुपदा, श्रीमरकतमणि कान्तिप्रभा
मा सदया, भवभयहरणा भक्तमनोवांछितफलदा (...)
श्रीसुरदेहसंभूत शिवा, श्रीपतिनेत्रप्रभातवरा
मा सदया परब्रह्मघना, सच्चिदानंदबोधप्रदा'
पाचूच्या तेजाने कान्तिमान झालेली, दहा मुखे असलेली अशा कालीची ही स्तुति आहे.या रचनेचा मागोवा घेताना मी थेट रामकृष्ण परमहंस यांच्या लेखनापर्यंत पोचलो. कालीबद्दल लिहिताना त्यांनी 'अखंड-सच्चिदानंद' हा शब्द वापरला आहे. काली कृष्णवर्णा आहे कारण ती परब्रह्म आहे. जसं अनंत अवकाश काळ्या रंगाचे, तसे अनंत परब्रह्मही काळ्या रंगाचे असं ते लिहितात. कालीसाठी परब्रह्म, सच्चिदानंद हे शब्द माझ्या पाहण्यात इतरत्र नाहीत. त्याचप्रमाणे कालीसाठी सदया, कल्याणकरी, कल्याणी ही संबोधनेही अस्सल बंगाली परम्परेतली (कल्याणेश्वरी, करुणामयी इत्यादी) वाटतात. या रचनेचा अजून एक विशेष म्हणजे श्यामा आणि कल्याणी या शब्दांचा  सुन्दर वापर, आणि श्याम कल्याण मधली स्वररचना. कालीचे श्यामा हे संबोधनही बंगाली परम्परेतलेच.
तिसरी रचना नक्की मुकुल शिवपुत्र यांची आहे का नाही याबद्दल मला खात्री नाही, परन्तु भाषेचा डौल आणि रचना बघता ती त्यांनीच लिहिली असावी, असं वाटतं.
'तं वन्दयामि गोविन्दं, कुंदरदनशुभमंदहास्ययुत चन्द्रवदनमजयुधृतधरणं
अम्बरसदृशमदम्भफणितमालम्बरहितसुखमम्बुजनाभम'
बाणभट्टाची आठवण व्हावी अशी ही दीर्घ समासांनी सजलेली, हमीर मधली रचना आहे. मुकुल शिवपुत्र यांनी ही पुण्यात सादर केली. 
याशिवाय भैरवमधे एक शिवस्तुति आहे, पण शब्द फारच अंधुक आठवत असल्याने ती इथे देत नाही. या सर्व रचनांमधून मुकुल शिवपुत्र यांचे संस्कृतवरील प्रभुत्व, भाषेची प्रगल्भता दिसतेच, पण मला आश्चर्य वाटतं ते त्यांच्या अफाट वाचनाचं. अनेक भाषांतील तत्वज्ञान, काव्य यांचा प्रभाव त्यांच्या रचनांमध्ये दिसतोच, आणि जोडीला त्यांचं इतिहास, भारतीय संस्कृति यातलं प्रभुत्वही दिसतं. प्रत्येक रचनेला तत्वज्ञानाची आणि अभ्यासाची एक पार्श्वभूमी आहे, आणि हे कुठेही ओढून ताणून आलेलं नाही. सा-या रचना अर्थदृष्टया सुबोध आहेत, आणि सहज आहेत. 
इतर बंदिशी गातानादेखील मुकुल शिवपुत्र यांची बंदिशींची निवड पाहण्याजोगी असते. सदारंग, अदारंग, यांसारखे पारंपरिक रचनाकार, कुमार, गुणिदास, वझेबुवा यांसारखे आधुनिक रचनाकार यांच्या जोडीला मध्वमुनीश्वर, सूरदास, तुलसीदास, इत्यादी कवीही त्यांच्या मैफलीत हजेरी लावतात. अत्यंत विचारपूर्वक केलेली बंदिशींची निवड आणि रागांचा क्रम, रागाचा भाव आणि बंदिशीचे शब्द यातलं नातं याने प्रत्येक मैफल एक अविस्मरणीय अनुभव होऊन जाते.
लोकसंगीत आणि मुकुलजी हा एक स्वतंत्र लेखविषय आहे, पण माझा लिहिण्याचा एकंदर उत्साह बघता लिहायला बसलोच आहे, तर फार फाफटपसारा न करता आत्ताच लिहावं हे बरं.
अहमदाबादेत काही महिन्यांपूर्वी झालेल्या मैफलीनंतर मुकुल शिवपुत्र यांनी लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत यांचं नातं उलगडून सांगितलं होतं. होनाजी बाळा, अनंतफंदी, रामजोशी यांच्या लावण्या हा मुकुलजींचा अभ्यासविषय आहे. अनेक जुन्या लावण्या त्यांना मुखोद्गत आहेत, कित्येक त्यांनी स्वरबद्ध केलेल्या आहेत. या लावण्या जे तत्वज्ञान सांगतात, अध्यात्म सांगतात त्याचा त्यांनी अभ्यास केला आहे असं दिसतं.
एखादा राग मांडत असताना त्या रागाचं मूळ कुठे आहे, हे माहिती असेल तर रागविस्तार अजून बारकाईने करता येतो. मालवती, बिहारी, यांसारख्या रागांनी लोकधुना शास्त्रीय संगीतात आणल्या. तसंच मालकंस, कल्याण, जोग, छायानट या आणि इतर अनेक रागांची मुळं लोकसंगीतात आहेत, पण अर्थात तिथे या रागांचं रूप बदलतं. मालकंस लोकसंगीतात रिषभ लावून गायला जातो. पंजाब मधले झूले, टप्पा, बंगाल मधील बाऊल, राजस्थानात मांड इत्यादी लोकासंगीतात अनेक राग कसे येतात याचा मुकुल शिवपुत्र यांनी निश्चित विचार केलेला आहे.
कलाकार किती मोठा असू शकतो, किती बहुश्रुत असू शकतो याची प्रचिती मुकुल शिवपुत्र यांच्या गायकीचा विचार करताना सतत येत राहते. असा गायक यापूर्वीही कधी झाला नसेल, कदाचित पुढेही होणार नाही. मुकुलजींच्या गायकीचा घेतलेला हा मागोवा अत्यंत अपुरा, तोकडा आहे, आणि मी हे लिहिताना कमी पडलेलो आहे याचीही मला जाणीव आहे. जे काही मला सुचलं, ते लिहून टाकलं.
काय म्या पामरे बोलावी उत्तरे ।
परी त्या विश्वंभरे बोलविले ॥२॥
तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा ।
चालवी पांगळा पायाविण ॥४॥
असा हा लिहिण्याचा प्रकार आहे. जे काही लिहिलं, त्यामागे मुकुल शिवपुत्र यांची अजोड गायकी आहे. ही गायकी समजून घेण्याचा प्रयत्न करावा, आणि तिचा आनंद घ्यावा एवढं तरी  आपल्या हाती नक्कीचआहे.
(समाप्त)


  

Thursday, July 19, 2012

हंस अकेला (भाग पहिला)


नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ शोधू नये असं म्हणतात. गाण्याचंही तसं आहे का?गायकी येते कुठून? त्यामागे किती संस्कार असतात? शोधायचं तरी किती? एखाद्या कलाकाराला समजून घेताना खरं तर त्याचंच मन सोबत पाहिजे. ते कुठून आणणार? आवाज आणि स्वर यांच्यामधलं अंतर कापताना माणसाचं निम्मं आयुष्य सरून जातं. मग ही माणसं इतके जीवघेणे सूर कसे लावू शकतात? प्रत्येक गायकाचा कलाकार आणि माणूस म्हणून झालेला प्रवास म्हणूनच अतिशय महत्त्वाचा असतो. लेखक जसा आपल्या आयुष्यावर लिहितो, तसं गायकाचं होत नसलं, तरी काही प्रमाणात त्याच्या आयुष्याचा त्याच्या गायकीवर प्रभाव पडतोच.
आधीच सांगतो, ही तुलना नाही, समीक्षा नाही. असं काही लिहिण्यासाठी मला तेवढी जाण नाही, आणि माझा तेवढा अधिकारही नाही. हा माझा एक प्रयत्न आहे, आणि यात मी खूप कमी पडणार याची मला स्पष्ट जाणीव आहे. पण मी जे काही लिहिणार आहे, ते मला उमजलेलं आहे, मला भावलेलं आहे. माझ्या शास्त्रीय संगीतातल्या अगाध अज्ञानाकडे बघता अनेक चुका होण्याचीही शक्यता आहे. हा एक मागोवा आहे असं म्हणण्यापेक्षा हा एक अभ्यास आहे, किंवा समजून घेण्याचा प्रयत्न आहे असं म्हणणं योग्य. 
मुकुल शिवपुत्र यांचा मी चाहता झालो ते पुण्यात कोंढवा पब्लिक स्कूल मधलं रेकॉर्डिंग ऐकून. काहीसा कुमार गंधर्वांची आठवण करून देणारा शंकरा. जोरकस. खणखणीत. त्यानंतर बरीच शोधाशोध केल्यानंतर २-३ सीडी मिळाल्या. या सीडींमधले  बागेश्री, कल्याण, सावनी बिहाग आणि तोडी असे काही जमलेले आहेत, की वेड लागावं. सगळ्या सीडी वापरून झिजेस्तोवर ऐकल्या, आणि मुकुलजींची पहिली प्रत्यक्ष मैफल ऐकली ती २००६ मधे कधीतरी. कुमार गंधर्व जयंतीच्या निमित्ताने त्यांचं गाणं पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात होतं. पहाटेची मैफल होती. मस्त माहोल जमला होता, आणि तिथे मी जे काही ऐकलं ते केवळ अविस्मरणीय होतं. एकापाठोपाठ एक अप्रतिम बंदिशी, आणि थक्क करून टाकणारी प्रतिभा. त्या मैफलीत मी तोडी, शुक्ल बिलावल, बिभास, देवगंधार हे राग ऐकले. चाहता ते भक्त असं रूपांतर करणारी ही बैठक. या माणसाला गाताना बघणं हा काय जबरदस्त अनुभव आहे याचं आलेलं पहिलं प्रत्यंतर.
माझं नशीब थोर होतं, मुकुल शिवपुत्र यांनी त्यानंतर पुण्यात चार पाच मैफली केल्या. बालशिक्षण मंदिरातला भैरव, विश्वभवन मधला मल्हार, गौड़ मल्हार, आणि दरबारी, गरवारे मधे गायलेला बीहड भैरव आणि खट, नाशिकला धडपडत जाऊन ऐकलेली बहादुरी, जळगावला गायलेला केदार, भरत नाट्य मधली पटमंजिरी, नागपूरमधे गायलेला सावनी बिहाग, मुंबईमधे गायलेला नट कामोद, जयजयवंती, अहमदाबादचा श्री आणि अगदी आत्ता आत्ता यशवंतराव मधला रति भैरव आणि देसी. अजूनही बरंच काही. आठवणी तरी किती सांगायच्या? प्रत्येक मैफल चकित करून टाकायची. आठदहा वर्षांपूर्वी ऐकलेलं गाणं, आणि आत्ताचं गाणं..केवढा फरक जाणवतो. प्रत्येक वेळी इतक्या नवीन गोष्टी, नवीन विचार. इतका निखळ आनंद यापूर्वी कधीच मिळाला नव्हता. लक्षात येतं, की हा माणूस फार मोठा आहे. केवळ कलाकार म्हणूनच नाही, तर माणूस म्हणूनही. याची जडणघडण फार वेगळी आहे. याची बुद्धी, प्रतिभा, अलौकिक आहे. गाण्यापलिकडेही जाणारी बुद्धीची झेप या गायकाकड़े आहे. मी तर अक्षरश: वेड्यासारखं मिळेल ते रेकॉर्डिंग ऐकलं. किती ऐकलं याची गणती नाही. जितक्या मैफली ऐकता आल्या तितक्या ऐकल्या,  आणि दिवसेंदिवस या गायकाची प्रतिमा मनात मोठी मोठी होत गेली.
मुकुल शिवपुत्र यांच्या गायकीचा विचार करायला सुरुवात करण्यापूर्वी काही थोडी माहिती मी लिहितो आहे. ही माहिती खरं तर कोणत्याही वेब सोर्स वर सापडेल, पण पुढचं लिहित असताना संदर्भांची अडचण नको.
कुमार गंधर्वांकडून मिळालेल्या अभिजात संगीताच्या तालमीनंतर मुकुल शिवपुत्र यांना गिंडेबुवांकडून ध्रुपद गायकीची तालीम मिळाली. एम्. डी. रामनाथन यांच्याकडे ते कर्नाटक शास्त्रीय संगीत शिकले. ते उत्तम पखवाज वादक आहेत, आणि त्यांनी काही नवीन तालही शोधले आहेत. ते उत्तम सतार वाजवतात, अनेक भाषा त्यांना येतात. संस्कृतचं शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी घेतलं आहे आणि संस्कृत मधे अनेक बंदिशी त्यांनी बांधल्या आहेत. लोकसंगीत, पुरातत्वशास्त्र, चित्रकला, साहित्य याची त्यांना सुरेख जाण आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर विचार केला, तर या असामान्य गायकाची विचारपद्धती, आणि संगीताबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन यावर बराच प्रकाश पडतो. कवी, संशोधक, वादक आणि त्याच जोडीला अत्यंत विलक्षण आयुष्य जगलेला कलाकार इतके पैलू एकत्र असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. आता यांच्या गायकीचा माझ्या परीने विचार करताना मी काही मैफलींची उदाहरणं देणार आहे. जितकं मला समजलं, किंवा जितकं समजून घ्यायचा मी प्रयत्न केला, तितकंच लिहिणार आहे. चूक भूल देणे-घेणे. (चुकांची सरबत्ती होणार आहे, तरी.)
पुण्यात एप्रिल २०१२ मधे झालेल्या बैठकीत मुकुलजींनी रति भैरव, अहीर भैरव, देसकार आणि देसी हे राग ऐकवले. रति भैरव हा जोड़राग आहे. भैरवच्या दोन छटा म्हणजे याचं पूर्वांग आणि उत्तरांग. पूर्वांगात भैरव आणि उत्तरांगात अहीर भैरव.
भैरव हा राग आहे, रागांग आहे, आणि थाट आहे. साधारणपणे भैरवचं पूर्वांग असं देता येईल-
"नी नी सा, नी सा ग म, ग म रे सा"
अहीर भैरवमध्ये पूर्वांग भैरवच्या मार्गाने जातं, तर उत्तरांगात क्वचित काफीचा भास होतो. शुद्ध धैवत आणि कोमल निषाद असलेला हा राग.
"ग म प ध, नी ध प, ध नी सां, सां नी ध प, ग म ग रे सा" असं काहीसं याचं चलन आहे.
 रति भैरव सादर करताना मुकुलजींनी प्रथम पूर्वांगात भैरव मांडून दाखवला. आंदोलित कोमल धैवत, रिषभ आणि क्वचित लागणारा दीर्घ मध्यम, यांच्या मदतीने भैरवांग स्पष्ट केल्यानंतर त्यांनी उत्तरांगात अहीर भैरव मांडला. दोन्ही भैरवछटा एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत हेही त्यांनी स्पष्ट करून दाखवलं.

असा राग गाताना त्यातल्या दोन्ही छटांचा समन्वय ठेवणं आणि दोन्ही रागांना न्याय देणं ही दोन मोठी आव्हानं असतात. त्यात हे दोन राग एकमेकांशी कसे जोडले आहेत, याचीही स्पष्ट कल्पना असावी लागते. ही सारी आव्हानं मुकुलजी लीलया पेलतात. भैरवसारखा विशाल राग गाताना त्याच्या अनेकविध छटा, बिभास, मलहरीसारखे त्याच्याशी जोडलेले राग यांचं भान त्यांना सतत असतंच, पण त्याहीपलिकडे 'आदि-राग' म्हणून वर्णन केलेल्या या रागाची अजूनही काही रूपं त्यांच्या मनात असतात. शिवाचं उग्र-संहारक रूप म्हणून वर्णन केलेला भैरव संगीतात धीरगंभीर कसा होतो, आणि उत्पत्ति-स्थिति-लय या शिवाशी निगडित असलेल्या तीनही छटा त्यात कशा दिसतात हा विचारही मुकुल शिवपुत्र तितक्याच ताकदीने करू शकतात.रागाचा विस्तार इतक्या ठाम पायावर होणं, ही या गाण्याची खरी ताकद आहे असं वाटतं.  
या मैफलीचा कळस होता तो मध्यंतरानंतर गायलेला देसी. हा राग विशेष कोणी गायलेला माझ्या ऐकिवात नाही. एकतर हा राग अत्यंत अवघड. त्याचं रूप स्वतंत्र आणि चलन वक्र. अनेक गायक, अनेक घराणी हा राग विविध त-हेने गातात.
देसीमधे मुख्यत्वे तीन भेद आहेत. शुद्ध धैवत, कोमल धैवत आणि दोन्ही धैवत लावून हा राग गायला जातो.  त्यातही निषादावर लक्ष ठेवून गावं लागतं. उत्तरंगात निषाद काफीचा भास निर्माण करू शकतो म्हणून. याशिवाय कोमल निषाद आणि शुद्ध निषाद लावूनपण देसी गातात. कुमार गंधर्वांच्या देसी मधल्या दोन बंदिशी पहा. एकीमध्ये कोमल निषाद आहे, एकीमध्ये शुद्ध.  पंचम-गंधार-मध्यम संगती आणि रिषभ-गंधार संगती ही या रागात लक्ष द्यावी अशी जागा.
मुकुल शिवपुत्र यांनी देसी सादर करताना पूर्वांगात शुद्ध धैवत आणि शुद्ध निषाद वापरले. अतिशय प्रभावी रिषभ, आणि रिषभ-कोमल गंधार संगती यांच्या मदतीने त्यांनी रागस्वरूप स्पष्ट केलं. पुढे उत्तरांगात मुकुलजींनी कोमल धैवत वापरून दोन धैवत देसीचा आभास निर्माण केला. "प म प" ही या देसीची संगती त्यांनी वापरली, आणि त्यातच "म प नी सा" या स्वरसमूहाच्या मदतीने त्यांनी जौनपुरीचं आस्तित्व दाखवलं (केसरबाईंच्या देसी मध्ये दिसतं तसं). याहीपुढे देसी आणि आसावरी यांचं नातं त्यांनी स्पष्ट केलं. हा देसी ऐकताना अनेकांना खट रागाचा भास झाला, आणि अनेकांनी तो खटच आहे असंही सांगितलं.कदाचित नंतर आलेला जौनपुरीचा भास आणि पूर्वांगात आलेला शुद्ध निषाद देसी याचा हा परिणाम असेल. खरं तर खट, देसी, आसावरी हे अतिशय जवळचे राग असूनही मुकुलजींनी खटाची छाया दूर ठेवल्याचं जाणवलं. खट मधे येणारा आंदोलित धैवत या देसीमध्ये कुठेही दिसला नाही, आणि मूळ देसीची रचना जशीच्या तशी राहिली. देसीचं अनेक रागांशी असलेलं नातं स्पष्ट करून दाखवताना देसीचं रूपही त्यांनी उलगडून दाखवलं.
पुण्याच्या गरवारे महाविद्यालयात मुकुलजींनी खट गायला होता. मोजून दहा-पंधरा मिनिटं. पण या छोट्या performance मध्ये त्यांनी खटचा असा चेहरा पेश केला, ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही.
खट हा 'षट' या शब्दाचा अपभ्रंश आहे, असं काही विद्वानांचं मत आहे. या रागात सहा रागांच्या छटा आहेत. दरबारी, आसावरी, बहादुरी, भैरवी, देसी आणि सुहासुगराई. काही जणांच्या मते हे सहा राग  भैरवी, देसी, सारंग, सुहा कानडा, सुगराई आणि खमाज असे आहेत. मुकुल शिवपुत्र यांनी खट गाताना त्यातली दरबारीची छटा दाखवली आणि पाठोपाठ सुहा कानडा, शहाणा कानडा यांचं आस्तित्वही दाखवलं. उत्तरांगात आसावरी, जौनपुरी, आणि भैरवी यांचं परस्पर नातं दाखवलं. 
अजून एक मैफल मला फार सांगावीशी वाटते, ती म्हणजे अहमदाबादेत २०११ मध्ये झालेली मैफल. या मैफलीत मुकुल शिवपुत्र यांनी श्री, धनबसंती, आणि खमाज हे राग गायले.
श्री हा पूर्वी थाटातला, अतिशय पुरातन राग आहे. याचं स्वरुप मींड-प्रधान, वक्र आणि अवघड. यात रिषभ, धैवत कोमल आणि मध्यम तीव्र. जमलेला श्री ऐकणं हा अतिशय मंत्रमुग्ध करणारा अनुभव असतो. श्री आरोहात गंधार-धैवत वर्ज्य करतो, तर अवरोहात सारे स्वर लागतात. (पुढच्या लिखाणात म' - तीव्र मध्यम.)

मुकुल शिवपुत्र यांनी श्री मधली स्वरचित बंदिश सादर केली. त्यापूर्वी प्रदीर्घ आलापीमधून त्यांनी श्रीचं रूप स्पष्ट केलं. श्रीचं रूप अधिक स्पष्ट करताना गंधारचा कण असलेला रिषभ, आणि रे-प-रे संगती त्यांनी वापरली. पूर्वांगात अत्यंत प्रभावी रिषभ आणि त्याची पंचमाशी असलेली संगती त्यांनी दाखवली. रिषभ-पंचम संगती त्यांनी "म' प प, प रेरे" अशा स्वरसमूहाच्या मदतीने स्थापित केली. श्रीचं उभं राहिलेलं रूप काहीसं असं सांगता येईल-
"म' प नी सां रें, नी प, सां(नी) प नी() प, म' प प, प रेरे
नी सा रे, ग(रे) सा नी सा रे, म' प प, प रेरे
रें नी प, म' प नी सां रें(गं) सां रें गं रें सां, नी सां रें नी प, म' प नी , म' रेरे ग, रे सा"
श्री मधली बंदिश हा एक अजून वेगळा विषय आहे, त्यावर मी पुढे लिहिन. पण जवळजवळ अर्ध्या तासाच्या दीर्घ आलापीमधून उभं राहिलेलं श्रीचं चित्र अत्यंत स्पष्ट होतं. श्री शिकायचा असेल तर ही रेकॉर्ड लावून शिकावं असं.
"रागाचं चलन पाळलंच पाहिजे, आणि त्या चलनात राहूनही स्वतंत्रपणे गाता आलं पाहिजे. एखाद्या रागात जर पाचच स्वर असतील, तर तेही खूप स्वातंत्र्य आहे. त्या पाच स्वरांत पूर्ण रागाचं चित्र उभं करता येतं." असं मुकुलजी एकदा म्हणाले आहेत. रागरूपाला किंचितही धक्का न लावता आपल्या प्रतिभेने त्या रागाच्या नवनवीन वाटा शोधत रहाण्याची ही प्रक्रिया मुकुल शिवपुत्र यांच्या गायकीला अजूनच प्रगल्भ, विचारप्रवण आणि अंतर्मुख बनवते, आणि त्यात त्यांचं मोठेपण आहे. राग-विस्तार हे शास्त्रीय संगीताचं सर्वात महत्त्वाचं बलस्थान. मुकुल शिवपुत्र यांच्या राग विस्ताराची काही उदाहरणं पहिली, तर सहज लक्षात येतं, की राग विस्तारून दाखवताना त्या रागाची उत्पत्ति, त्याचं रूप, आणि त्या रागाच्या इतर छटा याचा पूर्ण विचार त्यांनी आधीच केलेला आहे. प्रत्यक्ष मैफलीच्या वेळी ते फक्त या विचाराचा पाठपुरावा करतात. या सर्व विचाराला त्यांच्या व्यासंगाची, अभ्यासाची, संशोधक वृत्तीची, त्यांच्या अफाट व्यक्तिमत्वाची, कवित्वाची, आणि ध्रुपद-कर्नाटक गायकीची अतिशय विस्तृत पार्श्वभूमी मिळते, आणि एक असामान्य performance निर्माण होतो.
योऽसौ ध्वनिविशेषस्तु स्वरवर्णविभूषितः ।
रञ्जको जनचित्तानां स च राग उदाहृतः ।।
स्वर आणि वर्ण यांनी अलंकृत, आणि श्रोत्यांचं रंजन करणारा असा विशेष ध्वनि म्हणजे राग अशी रागाची व्याख्या आहे. स्वरासोबत वर्णालाही या व्याख्येत महत्त्व दिलेलं आहे. रागाच्या मांडणीनंतर काव्य म्हणून त्या बंदिशीचं सौंदर्यही लक्षात घेतलं, तर 'रञ्जको जनचित्तानां' याची पूर्तता होते.
बंदिशीचं रसग्रहण करताना मुकुल शिवपुत्र यांचा लोकसंगीत, संस्कृत आणि काव्याचा व्यासंग लक्षात घेतलाच पाहिजे. या विषयावर पुढच्या भागात लिहीन.
(क्रमश:)