Search This Blog

फेसबुक वर भेटायचं असेल तर..

Tuesday, October 16, 2012

हंस अकेला (भाग दुसरा)


आधीचा भाग इथे पहा.
पहिला भाग लिहून झाला आणि त्यानंतर बरेच दिवस आळसात गेले. मध्यंतरी मीही सरकारी नोकरी सोडून मुंबईमधे स्थलांतर केलं. या भानगडीत लिहायला मस्त उशीर होत गेला. त्यामुळे झालेल्या उशिराबद्दल निर्लज्जपणे काहीही न लिहिता थेट मुद्द्याला हात घालतो.
मी कलकत्त्याहून मुंबईमध्ये आलो, तेव्हा माझ्या नशिबाने मुकुल शिवपुत्र यांनी पुण्यात दोन अविस्मरणीय मैफली केल्या. पहिल्या मैफिलीतल्या सावनी, सावनी नट, बिहाग आणि दुस-या मैफलीमधला शिवकेदार आणि चंद्रकंस यांची धुंदी अजूनही उतरत नाहीये. या दोन्ही मैफलीत बुवा जे काही तब्येतीत गायले आहेत, की क्या कहे!  पार झपाटून टाकणा-या दोन बैठकी. आधी जे काही लिहायचं ठरवलं होतं, ते पार विसरून गेलो.
आकुर्डीला झालेल्या मैफलीत मुकुलजी सावनी बिहाग, सावनी, सावनी नट गायले. त्यानंतर त्यांनी मारुबिहाग मधलं भजन सादर केलं. मैफलीचा समारोप करताना त्यांनी महाकवी जयशंकर प्रसाद यांची (स्वत: संगीतबद्ध केलेली) कविता सादर केली.
"बीती विभावरी जाग री!
          अम्बर पनघट में डुबो रही-
         तारा-घट ऊषा नागरी।
खग-कुल कुल-कुल-सा बोल रहा,
किसलय का अंचल डोल रहा,
          लो यह लतिका भी भर ला‌ई-
          मधु मुकुल नवल रस गागरी"
कालिदासाच्या प्रतिमासृष्टिची आठवण करून देणारी ही कविता. जयशंकर प्रसाद यांच्या रचना भाषासौष्ठव, उपमा यांच्यादृष्टीने वेगळ्या समजल्या जातात. या कवीच्या कविता आजकाल अभावानेच वाचायला-ऐकायला मिळतात (माझ्या हिंदीच्या दिव्य वाचनात तर नाहीच!). सुरेख शब्द, आणि भैरवीचा हुरहुर लावणारा स्वरसाज. इतकं साजरं गारुड यापूर्वी खूप कमी वेळा ऐकायला मिळालं आहे. तशीच पुण्याला सहा वर्षांपूर्वी गायलेली भैरवी. हीरचे करूण शब्द. "मैंदा बिछड़ा यार मिलांदा.." आणि भैरवीचे सूर. अजूनही ही भैरवी ऐकली की पाणी येतं डोळ्यात.
मुकुलजींचे साथीदार म्हणतात की आजवर कुठल्याही दोन मैफलीत मुकुलजी एकच भैरवी गायलेले नाहीत.आणि विचार केला तर लक्षात येतं की हे खरं असावं. मी आजवर ऐकलेल्या मैफिलींमध्ये खरंच एक भैरवी परत ऐकलेली नाहीये. आणि बंदिशींचा पट केवढा मोठा. कबीरापासून कुमार गंधर्वांपर्यंत. कुमारजींच्या बंदिशी साहजिकच जास्त वेळा ऐकायला मिळतात, पण त्यांच्या जोडीला हीर, सूरदास, तुलसीदास, माळवी लोकधून आणि अनेक पारंपारिक बंदिशीपण ऐकल्यात.
आत्ता लिहिताना मी प्रामुख्याने दोन-तीन बंदिशी समोर ठेवून लिहिणार आहे. या मुकुल शिवपुत्र यांच्या संस्कृत रचना आहेत. त्यानंतर आपण बाकीच्या पैलूंचा विचार करू.
पहिली बंदिश मी एकदा पुण्यात ऐकली, तेव्हा ती भैरवमधे स्वरबद्ध होती. नंतर अहमदाबादेत हीच बंदिश मी श्री मध्ये ऐकली. आणि नंतर ही श्री मधेच स्वरबद्ध झालेली दिसते, आणि भैरवपेक्षा श्री या रचनेच्या रसपरिपोषासाठी जास्त योग्य वाटतो. मध्यलय रूपक मधली ही रचना आहे. 
'जगतमंगलभंगकृत सन्मंगलप्रद पालय शिवतनय हेरम्ब
पार्वतीप्रियबालक गजमुख गिरिजनुत दितिजान्तक, गणनायक 
वरदपाशसुमोदकांकुशविधृत सिंदुरांग शुभकर पालय, शिवतनय हेरम्ब(...)
मामनन्यगतिम्, प्रसीदमतिम् प्रबोधकरी सुवाक्पटुताम् महि देहि 
निर्विघ्नकरी परमोदारनामस्वकम्पकम कुरु पालय शिवतनय हेरम्ब'
जगातील अमंगल भंग करणा-या, मंगलप्रद अशा हे शिवतनय हेरम्बा, आमचे पालन कर, तूच माझी एकमेव गती आहेस, मजवर कृपा कर आणि मला वाक्पटुत्व दे, निर्विघ्नता दे  अशा अर्थाची ही रचना आहे. एखाद्या जुन्या संस्कृत काव्याचा भास व्हावा असे समास आणि संबोधने यांनी अजूनच समृद्ध झालेली ही रचना.

दुसरी बंदिश श्याम कल्याण मधली, मध्यलय त्रितालात बांधलेली आहे.
'कल्याणी कल्याणकरी, जय काली कल्याणकरी
जय श्यामा कल्याणकरी, जय गौरी कल्याणकरी
श्रीदशमुख दशकर दशसुपदा, श्रीमरकतमणि कान्तिप्रभा
मा सदया, भवभयहरणा भक्तमनोवांछितफलदा (...)
श्रीसुरदेहसंभूत शिवा, श्रीपतिनेत्रप्रभातवरा
मा सदया परब्रह्मघना, सच्चिदानंदबोधप्रदा'
पाचूच्या तेजाने कान्तिमान झालेली, दहा मुखे असलेली अशा कालीची ही स्तुति आहे.या रचनेचा मागोवा घेताना मी थेट रामकृष्ण परमहंस यांच्या लेखनापर्यंत पोचलो. कालीबद्दल लिहिताना त्यांनी 'अखंड-सच्चिदानंद' हा शब्द वापरला आहे. काली कृष्णवर्णा आहे कारण ती परब्रह्म आहे. जसं अनंत अवकाश काळ्या रंगाचे, तसे अनंत परब्रह्मही काळ्या रंगाचे असं ते लिहितात. कालीसाठी परब्रह्म, सच्चिदानंद हे शब्द माझ्या पाहण्यात इतरत्र नाहीत. त्याचप्रमाणे कालीसाठी सदया, कल्याणकरी, कल्याणी ही संबोधनेही अस्सल बंगाली परम्परेतली (कल्याणेश्वरी, करुणामयी इत्यादी) वाटतात. या रचनेचा अजून एक विशेष म्हणजे श्यामा आणि कल्याणी या शब्दांचा  सुन्दर वापर, आणि श्याम कल्याण मधली स्वररचना. कालीचे श्यामा हे संबोधनही बंगाली परम्परेतलेच.
तिसरी रचना नक्की मुकुल शिवपुत्र यांची आहे का नाही याबद्दल मला खात्री नाही, परन्तु भाषेचा डौल आणि रचना बघता ती त्यांनीच लिहिली असावी, असं वाटतं.
'तं वन्दयामि गोविन्दं, कुंदरदनशुभमंदहास्ययुत चन्द्रवदनमजयुधृतधरणं
अम्बरसदृशमदम्भफणितमालम्बरहितसुखमम्बुजनाभम'
बाणभट्टाची आठवण व्हावी अशी ही दीर्घ समासांनी सजलेली, हमीर मधली रचना आहे. मुकुल शिवपुत्र यांनी ही पुण्यात सादर केली. 
याशिवाय भैरवमधे एक शिवस्तुति आहे, पण शब्द फारच अंधुक आठवत असल्याने ती इथे देत नाही. या सर्व रचनांमधून मुकुल शिवपुत्र यांचे संस्कृतवरील प्रभुत्व, भाषेची प्रगल्भता दिसतेच, पण मला आश्चर्य वाटतं ते त्यांच्या अफाट वाचनाचं. अनेक भाषांतील तत्वज्ञान, काव्य यांचा प्रभाव त्यांच्या रचनांमध्ये दिसतोच, आणि जोडीला त्यांचं इतिहास, भारतीय संस्कृति यातलं प्रभुत्वही दिसतं. प्रत्येक रचनेला तत्वज्ञानाची आणि अभ्यासाची एक पार्श्वभूमी आहे, आणि हे कुठेही ओढून ताणून आलेलं नाही. सा-या रचना अर्थदृष्टया सुबोध आहेत, आणि सहज आहेत. 
इतर बंदिशी गातानादेखील मुकुल शिवपुत्र यांची बंदिशींची निवड पाहण्याजोगी असते. सदारंग, अदारंग, यांसारखे पारंपरिक रचनाकार, कुमार, गुणिदास, वझेबुवा यांसारखे आधुनिक रचनाकार यांच्या जोडीला मध्वमुनीश्वर, सूरदास, तुलसीदास, इत्यादी कवीही त्यांच्या मैफलीत हजेरी लावतात. अत्यंत विचारपूर्वक केलेली बंदिशींची निवड आणि रागांचा क्रम, रागाचा भाव आणि बंदिशीचे शब्द यातलं नातं याने प्रत्येक मैफल एक अविस्मरणीय अनुभव होऊन जाते.
लोकसंगीत आणि मुकुलजी हा एक स्वतंत्र लेखविषय आहे, पण माझा लिहिण्याचा एकंदर उत्साह बघता लिहायला बसलोच आहे, तर फार फाफटपसारा न करता आत्ताच लिहावं हे बरं.
अहमदाबादेत काही महिन्यांपूर्वी झालेल्या मैफलीनंतर मुकुल शिवपुत्र यांनी लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत यांचं नातं उलगडून सांगितलं होतं. होनाजी बाळा, अनंतफंदी, रामजोशी यांच्या लावण्या हा मुकुलजींचा अभ्यासविषय आहे. अनेक जुन्या लावण्या त्यांना मुखोद्गत आहेत, कित्येक त्यांनी स्वरबद्ध केलेल्या आहेत. या लावण्या जे तत्वज्ञान सांगतात, अध्यात्म सांगतात त्याचा त्यांनी अभ्यास केला आहे असं दिसतं.
एखादा राग मांडत असताना त्या रागाचं मूळ कुठे आहे, हे माहिती असेल तर रागविस्तार अजून बारकाईने करता येतो. मालवती, बिहारी, यांसारख्या रागांनी लोकधुना शास्त्रीय संगीतात आणल्या. तसंच मालकंस, कल्याण, जोग, छायानट या आणि इतर अनेक रागांची मुळं लोकसंगीतात आहेत, पण अर्थात तिथे या रागांचं रूप बदलतं. मालकंस लोकसंगीतात रिषभ लावून गायला जातो. पंजाब मधले झूले, टप्पा, बंगाल मधील बाऊल, राजस्थानात मांड इत्यादी लोकासंगीतात अनेक राग कसे येतात याचा मुकुल शिवपुत्र यांनी निश्चित विचार केलेला आहे.
कलाकार किती मोठा असू शकतो, किती बहुश्रुत असू शकतो याची प्रचिती मुकुल शिवपुत्र यांच्या गायकीचा विचार करताना सतत येत राहते. असा गायक यापूर्वीही कधी झाला नसेल, कदाचित पुढेही होणार नाही. मुकुलजींच्या गायकीचा घेतलेला हा मागोवा अत्यंत अपुरा, तोकडा आहे, आणि मी हे लिहिताना कमी पडलेलो आहे याचीही मला जाणीव आहे. जे काही मला सुचलं, ते लिहून टाकलं.
काय म्या पामरे बोलावी उत्तरे ।
परी त्या विश्वंभरे बोलविले ॥२॥
तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा ।
चालवी पांगळा पायाविण ॥४॥
असा हा लिहिण्याचा प्रकार आहे. जे काही लिहिलं, त्यामागे मुकुल शिवपुत्र यांची अजोड गायकी आहे. ही गायकी समजून घेण्याचा प्रयत्न करावा, आणि तिचा आनंद घ्यावा एवढं तरी  आपल्या हाती नक्कीचआहे.
(समाप्त)


  

Thursday, July 19, 2012

हंस अकेला (भाग पहिला)


नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ शोधू नये असं म्हणतात. गाण्याचंही तसं आहे का?गायकी येते कुठून? त्यामागे किती संस्कार असतात? शोधायचं तरी किती? एखाद्या कलाकाराला समजून घेताना खरं तर त्याचंच मन सोबत पाहिजे. ते कुठून आणणार? आवाज आणि स्वर यांच्यामधलं अंतर कापताना माणसाचं निम्मं आयुष्य सरून जातं. मग ही माणसं इतके जीवघेणे सूर कसे लावू शकतात? प्रत्येक गायकाचा कलाकार आणि माणूस म्हणून झालेला प्रवास म्हणूनच अतिशय महत्त्वाचा असतो. लेखक जसा आपल्या आयुष्यावर लिहितो, तसं गायकाचं होत नसलं, तरी काही प्रमाणात त्याच्या आयुष्याचा त्याच्या गायकीवर प्रभाव पडतोच.
आधीच सांगतो, ही तुलना नाही, समीक्षा नाही. असं काही लिहिण्यासाठी मला तेवढी जाण नाही, आणि माझा तेवढा अधिकारही नाही. हा माझा एक प्रयत्न आहे, आणि यात मी खूप कमी पडणार याची मला स्पष्ट जाणीव आहे. पण मी जे काही लिहिणार आहे, ते मला उमजलेलं आहे, मला भावलेलं आहे. माझ्या शास्त्रीय संगीतातल्या अगाध अज्ञानाकडे बघता अनेक चुका होण्याचीही शक्यता आहे. हा एक मागोवा आहे असं म्हणण्यापेक्षा हा एक अभ्यास आहे, किंवा समजून घेण्याचा प्रयत्न आहे असं म्हणणं योग्य. 
मुकुल शिवपुत्र यांचा मी चाहता झालो ते पुण्यात कोंढवा पब्लिक स्कूल मधलं रेकॉर्डिंग ऐकून. काहीसा कुमार गंधर्वांची आठवण करून देणारा शंकरा. जोरकस. खणखणीत. त्यानंतर बरीच शोधाशोध केल्यानंतर २-३ सीडी मिळाल्या. या सीडींमधले  बागेश्री, कल्याण, सावनी बिहाग आणि तोडी असे काही जमलेले आहेत, की वेड लागावं. सगळ्या सीडी वापरून झिजेस्तोवर ऐकल्या, आणि मुकुलजींची पहिली प्रत्यक्ष मैफल ऐकली ती २००६ मधे कधीतरी. कुमार गंधर्व जयंतीच्या निमित्ताने त्यांचं गाणं पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात होतं. पहाटेची मैफल होती. मस्त माहोल जमला होता, आणि तिथे मी जे काही ऐकलं ते केवळ अविस्मरणीय होतं. एकापाठोपाठ एक अप्रतिम बंदिशी, आणि थक्क करून टाकणारी प्रतिभा. त्या मैफलीत मी तोडी, शुक्ल बिलावल, बिभास, देवगंधार हे राग ऐकले. चाहता ते भक्त असं रूपांतर करणारी ही बैठक. या माणसाला गाताना बघणं हा काय जबरदस्त अनुभव आहे याचं आलेलं पहिलं प्रत्यंतर.
माझं नशीब थोर होतं, मुकुल शिवपुत्र यांनी त्यानंतर पुण्यात चार पाच मैफली केल्या. बालशिक्षण मंदिरातला भैरव, विश्वभवन मधला मल्हार, गौड़ मल्हार, आणि दरबारी, गरवारे मधे गायलेला बीहड भैरव आणि खट, नाशिकला धडपडत जाऊन ऐकलेली बहादुरी, जळगावला गायलेला केदार, भरत नाट्य मधली पटमंजिरी, नागपूरमधे गायलेला सावनी बिहाग, मुंबईमधे गायलेला नट कामोद, जयजयवंती, अहमदाबादचा श्री आणि अगदी आत्ता आत्ता यशवंतराव मधला रति भैरव आणि देसी. अजूनही बरंच काही. आठवणी तरी किती सांगायच्या? प्रत्येक मैफल चकित करून टाकायची. आठदहा वर्षांपूर्वी ऐकलेलं गाणं, आणि आत्ताचं गाणं..केवढा फरक जाणवतो. प्रत्येक वेळी इतक्या नवीन गोष्टी, नवीन विचार. इतका निखळ आनंद यापूर्वी कधीच मिळाला नव्हता. लक्षात येतं, की हा माणूस फार मोठा आहे. केवळ कलाकार म्हणूनच नाही, तर माणूस म्हणूनही. याची जडणघडण फार वेगळी आहे. याची बुद्धी, प्रतिभा, अलौकिक आहे. गाण्यापलिकडेही जाणारी बुद्धीची झेप या गायकाकड़े आहे. मी तर अक्षरश: वेड्यासारखं मिळेल ते रेकॉर्डिंग ऐकलं. किती ऐकलं याची गणती नाही. जितक्या मैफली ऐकता आल्या तितक्या ऐकल्या,  आणि दिवसेंदिवस या गायकाची प्रतिमा मनात मोठी मोठी होत गेली.
मुकुल शिवपुत्र यांच्या गायकीचा विचार करायला सुरुवात करण्यापूर्वी काही थोडी माहिती मी लिहितो आहे. ही माहिती खरं तर कोणत्याही वेब सोर्स वर सापडेल, पण पुढचं लिहित असताना संदर्भांची अडचण नको.
कुमार गंधर्वांकडून मिळालेल्या अभिजात संगीताच्या तालमीनंतर मुकुल शिवपुत्र यांना गिंडेबुवांकडून ध्रुपद गायकीची तालीम मिळाली. एम्. डी. रामनाथन यांच्याकडे ते कर्नाटक शास्त्रीय संगीत शिकले. ते उत्तम पखवाज वादक आहेत, आणि त्यांनी काही नवीन तालही शोधले आहेत. ते उत्तम सतार वाजवतात, अनेक भाषा त्यांना येतात. संस्कृतचं शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी घेतलं आहे आणि संस्कृत मधे अनेक बंदिशी त्यांनी बांधल्या आहेत. लोकसंगीत, पुरातत्वशास्त्र, चित्रकला, साहित्य याची त्यांना सुरेख जाण आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर विचार केला, तर या असामान्य गायकाची विचारपद्धती, आणि संगीताबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन यावर बराच प्रकाश पडतो. कवी, संशोधक, वादक आणि त्याच जोडीला अत्यंत विलक्षण आयुष्य जगलेला कलाकार इतके पैलू एकत्र असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. आता यांच्या गायकीचा माझ्या परीने विचार करताना मी काही मैफलींची उदाहरणं देणार आहे. जितकं मला समजलं, किंवा जितकं समजून घ्यायचा मी प्रयत्न केला, तितकंच लिहिणार आहे. चूक भूल देणे-घेणे. (चुकांची सरबत्ती होणार आहे, तरी.)
पुण्यात एप्रिल २०१२ मधे झालेल्या बैठकीत मुकुलजींनी रति भैरव, अहीर भैरव, देसकार आणि देसी हे राग ऐकवले. रति भैरव हा जोड़राग आहे. भैरवच्या दोन छटा म्हणजे याचं पूर्वांग आणि उत्तरांग. पूर्वांगात भैरव आणि उत्तरांगात अहीर भैरव.
भैरव हा राग आहे, रागांग आहे, आणि थाट आहे. साधारणपणे भैरवचं पूर्वांग असं देता येईल-
"नी नी सा, नी सा ग म, ग म रे सा"
अहीर भैरवमध्ये पूर्वांग भैरवच्या मार्गाने जातं, तर उत्तरांगात क्वचित काफीचा भास होतो. शुद्ध धैवत आणि कोमल निषाद असलेला हा राग.
"ग म प ध, नी ध प, ध नी सां, सां नी ध प, ग म ग रे सा" असं काहीसं याचं चलन आहे.
 रति भैरव सादर करताना मुकुलजींनी प्रथम पूर्वांगात भैरव मांडून दाखवला. आंदोलित कोमल धैवत, रिषभ आणि क्वचित लागणारा दीर्घ मध्यम, यांच्या मदतीने भैरवांग स्पष्ट केल्यानंतर त्यांनी उत्तरांगात अहीर भैरव मांडला. दोन्ही भैरवछटा एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत हेही त्यांनी स्पष्ट करून दाखवलं.

असा राग गाताना त्यातल्या दोन्ही छटांचा समन्वय ठेवणं आणि दोन्ही रागांना न्याय देणं ही दोन मोठी आव्हानं असतात. त्यात हे दोन राग एकमेकांशी कसे जोडले आहेत, याचीही स्पष्ट कल्पना असावी लागते. ही सारी आव्हानं मुकुलजी लीलया पेलतात. भैरवसारखा विशाल राग गाताना त्याच्या अनेकविध छटा, बिभास, मलहरीसारखे त्याच्याशी जोडलेले राग यांचं भान त्यांना सतत असतंच, पण त्याहीपलिकडे 'आदि-राग' म्हणून वर्णन केलेल्या या रागाची अजूनही काही रूपं त्यांच्या मनात असतात. शिवाचं उग्र-संहारक रूप म्हणून वर्णन केलेला भैरव संगीतात धीरगंभीर कसा होतो, आणि उत्पत्ति-स्थिति-लय या शिवाशी निगडित असलेल्या तीनही छटा त्यात कशा दिसतात हा विचारही मुकुल शिवपुत्र तितक्याच ताकदीने करू शकतात.रागाचा विस्तार इतक्या ठाम पायावर होणं, ही या गाण्याची खरी ताकद आहे असं वाटतं.  
या मैफलीचा कळस होता तो मध्यंतरानंतर गायलेला देसी. हा राग विशेष कोणी गायलेला माझ्या ऐकिवात नाही. एकतर हा राग अत्यंत अवघड. त्याचं रूप स्वतंत्र आणि चलन वक्र. अनेक गायक, अनेक घराणी हा राग विविध त-हेने गातात.
देसीमधे मुख्यत्वे तीन भेद आहेत. शुद्ध धैवत, कोमल धैवत आणि दोन्ही धैवत लावून हा राग गायला जातो.  त्यातही निषादावर लक्ष ठेवून गावं लागतं. उत्तरंगात निषाद काफीचा भास निर्माण करू शकतो म्हणून. याशिवाय कोमल निषाद आणि शुद्ध निषाद लावूनपण देसी गातात. कुमार गंधर्वांच्या देसी मधल्या दोन बंदिशी पहा. एकीमध्ये कोमल निषाद आहे, एकीमध्ये शुद्ध.  पंचम-गंधार-मध्यम संगती आणि रिषभ-गंधार संगती ही या रागात लक्ष द्यावी अशी जागा.
मुकुल शिवपुत्र यांनी देसी सादर करताना पूर्वांगात शुद्ध धैवत आणि शुद्ध निषाद वापरले. अतिशय प्रभावी रिषभ, आणि रिषभ-कोमल गंधार संगती यांच्या मदतीने त्यांनी रागस्वरूप स्पष्ट केलं. पुढे उत्तरांगात मुकुलजींनी कोमल धैवत वापरून दोन धैवत देसीचा आभास निर्माण केला. "प म प" ही या देसीची संगती त्यांनी वापरली, आणि त्यातच "म प नी सा" या स्वरसमूहाच्या मदतीने त्यांनी जौनपुरीचं आस्तित्व दाखवलं (केसरबाईंच्या देसी मध्ये दिसतं तसं). याहीपुढे देसी आणि आसावरी यांचं नातं त्यांनी स्पष्ट केलं. हा देसी ऐकताना अनेकांना खट रागाचा भास झाला, आणि अनेकांनी तो खटच आहे असंही सांगितलं.कदाचित नंतर आलेला जौनपुरीचा भास आणि पूर्वांगात आलेला शुद्ध निषाद देसी याचा हा परिणाम असेल. खरं तर खट, देसी, आसावरी हे अतिशय जवळचे राग असूनही मुकुलजींनी खटाची छाया दूर ठेवल्याचं जाणवलं. खट मधे येणारा आंदोलित धैवत या देसीमध्ये कुठेही दिसला नाही, आणि मूळ देसीची रचना जशीच्या तशी राहिली. देसीचं अनेक रागांशी असलेलं नातं स्पष्ट करून दाखवताना देसीचं रूपही त्यांनी उलगडून दाखवलं.
पुण्याच्या गरवारे महाविद्यालयात मुकुलजींनी खट गायला होता. मोजून दहा-पंधरा मिनिटं. पण या छोट्या performance मध्ये त्यांनी खटचा असा चेहरा पेश केला, ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही.
खट हा 'षट' या शब्दाचा अपभ्रंश आहे, असं काही विद्वानांचं मत आहे. या रागात सहा रागांच्या छटा आहेत. दरबारी, आसावरी, बहादुरी, भैरवी, देसी आणि सुहासुगराई. काही जणांच्या मते हे सहा राग  भैरवी, देसी, सारंग, सुहा कानडा, सुगराई आणि खमाज असे आहेत. मुकुल शिवपुत्र यांनी खट गाताना त्यातली दरबारीची छटा दाखवली आणि पाठोपाठ सुहा कानडा, शहाणा कानडा यांचं आस्तित्वही दाखवलं. उत्तरांगात आसावरी, जौनपुरी, आणि भैरवी यांचं परस्पर नातं दाखवलं. 
अजून एक मैफल मला फार सांगावीशी वाटते, ती म्हणजे अहमदाबादेत २०११ मध्ये झालेली मैफल. या मैफलीत मुकुल शिवपुत्र यांनी श्री, धनबसंती, आणि खमाज हे राग गायले.
श्री हा पूर्वी थाटातला, अतिशय पुरातन राग आहे. याचं स्वरुप मींड-प्रधान, वक्र आणि अवघड. यात रिषभ, धैवत कोमल आणि मध्यम तीव्र. जमलेला श्री ऐकणं हा अतिशय मंत्रमुग्ध करणारा अनुभव असतो. श्री आरोहात गंधार-धैवत वर्ज्य करतो, तर अवरोहात सारे स्वर लागतात. (पुढच्या लिखाणात म' - तीव्र मध्यम.)

मुकुल शिवपुत्र यांनी श्री मधली स्वरचित बंदिश सादर केली. त्यापूर्वी प्रदीर्घ आलापीमधून त्यांनी श्रीचं रूप स्पष्ट केलं. श्रीचं रूप अधिक स्पष्ट करताना गंधारचा कण असलेला रिषभ, आणि रे-प-रे संगती त्यांनी वापरली. पूर्वांगात अत्यंत प्रभावी रिषभ आणि त्याची पंचमाशी असलेली संगती त्यांनी दाखवली. रिषभ-पंचम संगती त्यांनी "म' प प, प रेरे" अशा स्वरसमूहाच्या मदतीने स्थापित केली. श्रीचं उभं राहिलेलं रूप काहीसं असं सांगता येईल-
"म' प नी सां रें, नी प, सां(नी) प नी() प, म' प प, प रेरे
नी सा रे, ग(रे) सा नी सा रे, म' प प, प रेरे
रें नी प, म' प नी सां रें(गं) सां रें गं रें सां, नी सां रें नी प, म' प नी , म' रेरे ग, रे सा"
श्री मधली बंदिश हा एक अजून वेगळा विषय आहे, त्यावर मी पुढे लिहिन. पण जवळजवळ अर्ध्या तासाच्या दीर्घ आलापीमधून उभं राहिलेलं श्रीचं चित्र अत्यंत स्पष्ट होतं. श्री शिकायचा असेल तर ही रेकॉर्ड लावून शिकावं असं.
"रागाचं चलन पाळलंच पाहिजे, आणि त्या चलनात राहूनही स्वतंत्रपणे गाता आलं पाहिजे. एखाद्या रागात जर पाचच स्वर असतील, तर तेही खूप स्वातंत्र्य आहे. त्या पाच स्वरांत पूर्ण रागाचं चित्र उभं करता येतं." असं मुकुलजी एकदा म्हणाले आहेत. रागरूपाला किंचितही धक्का न लावता आपल्या प्रतिभेने त्या रागाच्या नवनवीन वाटा शोधत रहाण्याची ही प्रक्रिया मुकुल शिवपुत्र यांच्या गायकीला अजूनच प्रगल्भ, विचारप्रवण आणि अंतर्मुख बनवते, आणि त्यात त्यांचं मोठेपण आहे. राग-विस्तार हे शास्त्रीय संगीताचं सर्वात महत्त्वाचं बलस्थान. मुकुल शिवपुत्र यांच्या राग विस्ताराची काही उदाहरणं पहिली, तर सहज लक्षात येतं, की राग विस्तारून दाखवताना त्या रागाची उत्पत्ति, त्याचं रूप, आणि त्या रागाच्या इतर छटा याचा पूर्ण विचार त्यांनी आधीच केलेला आहे. प्रत्यक्ष मैफलीच्या वेळी ते फक्त या विचाराचा पाठपुरावा करतात. या सर्व विचाराला त्यांच्या व्यासंगाची, अभ्यासाची, संशोधक वृत्तीची, त्यांच्या अफाट व्यक्तिमत्वाची, कवित्वाची, आणि ध्रुपद-कर्नाटक गायकीची अतिशय विस्तृत पार्श्वभूमी मिळते, आणि एक असामान्य performance निर्माण होतो.
योऽसौ ध्वनिविशेषस्तु स्वरवर्णविभूषितः ।
रञ्जको जनचित्तानां स च राग उदाहृतः ।।
स्वर आणि वर्ण यांनी अलंकृत, आणि श्रोत्यांचं रंजन करणारा असा विशेष ध्वनि म्हणजे राग अशी रागाची व्याख्या आहे. स्वरासोबत वर्णालाही या व्याख्येत महत्त्व दिलेलं आहे. रागाच्या मांडणीनंतर काव्य म्हणून त्या बंदिशीचं सौंदर्यही लक्षात घेतलं, तर 'रञ्जको जनचित्तानां' याची पूर्तता होते.
बंदिशीचं रसग्रहण करताना मुकुल शिवपुत्र यांचा लोकसंगीत, संस्कृत आणि काव्याचा व्यासंग लक्षात घेतलाच पाहिजे. या विषयावर पुढच्या भागात लिहीन.
(क्रमश:) 

Thursday, July 5, 2012

कुमार गंधर्व- एक दर्शन



मैफल अर्ध्यातूनच सुरु होते.
आधीचा भाग माहिती नाही कुठे आहे ते.
साधी, घरगुती मैफल. इनेगिने लोक. काही परिचित चेहरे दिसतायत.
मधूनच दाद ऐकू येत आहे.
मैफलीच्या मध्यभागी तुम्ही आहात, कुमार.
साधा पांढरा कुडता आणि पायजमा. समोर एक वही.
लहान मुलासारखा निरागस चेहरा. विलक्षण बोलका.
तितकेच बोलके डोळे.
जणू तुम्हाला दिठीसमोर सुरांचा प्रवाहो दिसतो आहे.
वरच्या पट्टीतला तुमचा धारदार आवाज.
तानपुरे तुम्हीच लावले असावेत, कारण तेही आत्यंतिक सुरेल लागलेत.
मागे स्वरसाथीला कोणी नाही.
तुम्ही एकटेच गात आहात, कुमार.
अतिशय सहजपणे.
आनंदाने.
तुमचा आवाजही कमालीच्या वेगाने फिरतो आहे.
एक एक सूर जीवघेणा. आर्त.
तुम्ही मालकंस गाताय.
तीन-चारशे वर्षं जुना राग. समुद्रासारखा विराट. गंभीर.
जितकं खोल जावं तितका खोल होणारा.
अनेकांनी गायलेला.
तुम्ही लीलया गात आहात. सारं काही मालकंस झालं आहे.
षड्ज-मध्यम, गंधार-धैवत आणि मध्यम-निषाद. अनाहत नाद आणि संवाद.
बंदिशही सुरेख आहे. झपताल, मध्यलयीतला ठेका.
"हम भये जंगम, रूप जगत सार
मेहरबानी करो, दरसन दो प्रभु
तुम भये रूप अरूप जगत सार"
गंधार-षड्जाच्या मींडमध्ये तुम्ही रिषभ दाखवताय बहुतेक.
तोही हलकाच. आभास निर्माण होईल एवढाच.
कदाचित आधीचा, अजून जुना मालकंस असाच रिषभ घेऊन येत असावा.
आदिकालापासून सुरु असलेला हा मालकंस.
पण मला मजा वाटतीये ती तुमच्या सहजतेची.
सहज नदी वाहत जावी तसं सहज गाणं चालू आहे.
ऊस्फूर्त हातवारे. डोलणं. चेह-यावर क्षणात बदलणारे भाव.
जणू तुम्ही कोणाशीतरी गप्पा मारत आहात.
कितीदा तुमच्या चेह-यावर हसू दिसतंय. तेही लहान मूल हसावं तसं.
हा निखळ आनंद. ऋषिंनी 'ब्रह्मानंद ' म्हटलाय तसा.
गाता गाता तुम्ही थांबता. बंदिशीचा अर्थ सांगता,
" 'ये सब भये सोहर'  म्हणजे जे काही घडतंय ते सुन्दर आहे.
सब अच्छा है.
छान आहे सगळं. आता आपण काय करायचं त्याला?"
आणि तुम्ही पुन्हा गाऊ लागता.
श्रोते आणि तुमचा संवाद तर चालूच आहे,
पण दुसरा शब्देविण संवादू कोणाशी?
स्वत:शी? सुरांशी? की त्याहीपलिकडे असलेल्या कोणाशीतरी?
तुम्हीच सांगता, गाणं हे काही केवळ सात सुरांत बांधलेलं नाही.
ध्वनिचे नुसते संकेत असतात, नाद निनाद असतात अशा प्रांतातून ते येतं.
तुमचा त्याच शून्य ध्वनिशी संवाद चालू असेल.
ज्या निर्गुण आवाजाचा तुम्ही ध्यास घेतला होता, त्या निर्गुणाशी.
तुम्हाला ज्यांनी गाताना पहिलं, ते खरंच भाग्याचे, कुमार.
तुम्ही गेलात तेव्हा मी पाच-सहा वर्षांचा असेन.
त्यामुळे तुम्हाला गाताना कधीच पहिलं नाही मी.
अशी सलग मैफल नाहीच.
आजवर तुमचं गाणं भरभरून ऐकलं आहे तरीही.
पण कोणीतरी रेकॉर्ड करून ठेवलेली ही मैफल बघताना नजर हलत नाहीये.
मालकंस झाल्यावर तुम्ही अजून एक दोन बंदिशी ऐकवता.
बहुतेक कुठला तरी कल्याण.
मग एक ठुमरी. तब्येतीत.
दोन अंत-यांसकट.
सूरदासाची भैरवी सुरु झाली आहे.
"निकसी कुंवर, खेलन चले रंग होरी.."
मैफल संपत आल्याची जाणीव आहे,
पण ही भैरवीदेखील नेहमीसारखी उदास हुरहुर लावत नाहीये.
सारं काही तृप्त, शांत, प्रसन्न आहे.
भरून पावल्याचं समाधान आहे.
तुम्ही गात आहात, कुमार.

कायमचे. मैफल संपली तरी.

Wednesday, June 13, 2012

माया महाठगिनी, हम जानी|

(काही तांत्रिक घोळ झाल्याने मागची पोस्ट पब्लिश होण्यात ब-याच  अडचणी आल्या. ती पोस्ट वाचायची असल्यास इथे वाचा.)

आठ महिने सरकारी प्रशिक्षण  पूर्ण झालं, आणि मायबाप सरकारने आमची पालखी कलकत्त्याला नेली. गेलं एक वर्ष मी इथे राहतो आहे.
आम्ही भूशास्त्रज्ञ असल्यामुळे टेबलावर पाय टाकून झोपा काढणे, उठसूट चहाला जाणे,  एका मिनिटाच्या कामाला महिना लावणे (हे काही प्रमाणात आमचे वरिष्ठ आणि कनिष्ठ करून दाखवतात), आल्यागेल्यावर खेकसणे, हे अत्यंत सुखद प्रकार काही आमच्या नशिबी लिहिलेले नाहीत. आम्हाला नोकरी दिली या पापाचं परिमार्जन सरकार अनेक प्रकारे करत असतं. नियम असा आहे, की वर्षातले एकशे वीस दिवस आम्हाला फिल्डवर्क करावं लागतं. आणि हे एकशे वीस दिवस झाले की नाहीत हे सरकार आखाडसास-या सारखं बघत असतं. त्यामुळे आम्ही gazetted ऑफिसर असलो, तरी शुभ्र कपडे, चकचकीत गाड्या हे काही आमचं जग नाही. फाटकी जीप, धुळीने भरलेले केस, वाढलेली दाढी, मळके कपडे अशा अवतारात एखादा माणूस उन्हातान्हात दगड फोडताना दिसला तर तो सरकारी  भूशास्त्रज्ञ सोडून दुसरा कोणी असूच शकत नाही. असो.
तर वर्षातले एकशे वीस दिवस आम्ही कुठेही काढतो. शक्यतो जिथून काम करण्याचा एरिया जास्तीत जास्त जवळ पडेल, आणि डीझेलचा खर्च कमी होईल (हापण एक सासुरवास असतो) अशा जागी. बरेचदा अशा जागा अतिशय अडनेड्या असतात. त्यात परत आम्हाला ऑफिसमध्ये दरमहा बोलावून त्रास देण्याची प्रथा आहे. त्यासाठी रस्ते, रेल्वे सोयीस्कर आहे की नाही हेही बघावं लागतं. या सगळ्या सोपस्काराला 'कॅम्प टाकणे' असं नाव आहे. एकदा कॅम्प टाकला, की  कामाला सुरुवात होते. जीप घेऊन एरियाचा कानाकोपरा तपासून पाहायचा, आणि ठराविक इन्टर्वलने दगड-मातीचे नमुने घ्यायचे असं आमच्या कामाचं साधारण स्वरूप असतं. या पद्धतीचं काम 2001 मध्ये चीनने पूर्ण केलं, आणि ते काही अंशी यशस्वीही झालं. हे नमुने प्रयोगशाळेत धाडले जातात, आणि त्यांच्यातल्या 64 मूलद्रव्यांची तपासणी केली जाते. ही माहिती परत आम्ही तपासतो, आणि interprete करतो. याचा अनेक गोष्टींसाठी उपयोग होतो (अधिक माहितीसाठी वाचा). या सगळ्या कामासाठी सरकार आम्हाला काही मोजकी रक्कम देतं. जीपची मोडतोड-दुरुस्ती, डीझेल, कामगारांचे पगार, उपकरणं, कॅम्पचे किरकोळ खर्च, असे अनेक खर्च यात असतात. हा सारा खर्च अतिशय काटेकोरपणे करावा लागतो. दर दिवशी एक माणूस किती दगड-माती गोळा करू शकतो याचं सरकारने (डोकं बाजूला ठेवून) एक गणित केलेलं आहे. तेही लक्षात ठेवून काम करावं लागतं. याचा फायदा एकच आहे, की ज्या भागात आम्ही काम करतो, तो परिसर आम्हाला खूप जवळून अनुभवता येतो. जिथे कोणी फिरकतही नाही अशा जागी आम्ही जातो. रस्ता नसेल, जीप जाऊ शकत नसेल, तर चार नमुने घेण्यासाठी आठ-दहा किलोमीटर चालत जाणं अगदी नेहमीचं. या सा-या कामासाठी आम्ही साधारण चार ते पाच लोक कामाला घेतो. ही माणसं सहज मिळतातही, कारण इतर कामात यांना दर दिवसाचे जितके पैसे मिळतात त्याच्या जवळपास दुप्पट पैसे सरकारी कामात मिळतात. अर्थात ही दुप्पट रक्कमही विशेष नसतेच, पण यासाठी माती खोदणे, वाळवणे, कुटणे, चाळणे, आणि डब्यात भरणे, दगड असेल तर त्याचे छोटे तुकडे करून डब्यात भरणे ही कामं हे लोक करतात. हे काम सोपं नाही. अत्यंत लहान चूक सगळ्या कामाचं रूप बदलू शकते. एकशे वीस दिवसात आम्ही 923 नमुने गोळा करतो, आणि हा कामाचा पहाड पूर्ण करताना सगळ्यांच्या कमरेचे टाके ढिले होतात.
 मातीचा नमुना घेताना. 
कुठल्याही धातुमुळे contamination होऊ नये म्हणून लाकडी दांड्याने खोदकाम करतात.

इतकी माणसं, इतके दिवस, इतकं काम, इतकी भटकंती यामुळे सारी दृष्टी बदलून जाते. स्थानिक लोक आणि अनेकदा वन्यप्राणी यांच्याशी संबंध येतो. या सा-या कामाचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे. (अजून एक फायदा म्हणजे ऑफिसात आम्हाला कोणीही भाव देत नसलं, तरी फिल्डवर बराच मान मिळतो!) खरं तर 'मासे, दुर्गापूजा,रसगुल्ले आणि टागोर' या चौकटीतून बाहेर पडून बंगाल पाहिला, तर एक फार वेगळा चेहरा दिसतो जो  कलकत्ता-शांतीनिकेतन ट्रीप काढून नाही दिसत. कलकत्त्याला बदली झाल्यावर वर्षभर  मी पुरुलिया-बांकुडा या भागात काम केलं. या कामात मी जो बंगाल पाहिला, तो असा चौकटीपल्याडचा होता.
पुरुलिया-बांकुडा-मिदनापूर या तीन जिल्ह्यांना जंगलमहाल म्हणतात. दक्षिण-पश्चिम बंगाल, आणि बंगाल-झारखंड सीमा असा प्रदेश या जंगलमहालने व्यापला आहे. हवा-पाणी-सुरक्षा यादृष्टीने अतिशय प्रतिकूल असा हा भाग. मे महिन्यात इथे 48-49 अंश इतकं तापमान असतं. पाण्यात आर्सेनिक, लोह आणि फ्लुराईड. माओवादी, हत्ती तर नेहमीचे. इथल्या जंगलात फिरताना अतिशय काळजी घ्यावी लागते. माणूस आणि हत्ती यांचा संघर्षही आता तीव्र होऊ लागला आहे.
 गंगाजलघाटी, बांकुडा इथे शेतात घुसलेला हत्ती 

हे सारे दशावतार सोसणारी माणसंही इथेच आहेत. त्यांना हे भोग भोगायला लावणारे माओवादीही इथलेच. कुठेही फिरा, डोळ्यावर चटकन आघात करून जाते ती इथली गरिबी. याला कोण जबाबदार आहे, यावर उपाय काय आहे या सगळ्या पुढच्या गोष्टी. पण आत्ता दोन-एकशे रुपये जास्त दिले म्हणून एक चाळीशी-पन्नाशीचा माणूस एका पंचविशीतल्या मुलाचे पाय धरू पाहतो, तेव्हा शरमेने सारं आयुष्य आकसून जातं. पैसे माझे नाहीत, ते सरकारचे आहेत. देणारा फक्त मी. "कशास एका भिकारड्याला पुकारतो हा दुजा भिकारी?" असा हा प्रकार. तरीही त्या घटकेला त्या कामगारासाठी मीच सरकार असतो ना? मग माझी जबाबदारी नक्की काय आहे? चार पैसे जास्त मिळावेत म्हणून काम हळूहळू करण्याची यांची केविलवाणी खटपट जेव्हा लक्षात येते, तेव्हा त्यांच्यावर डाफरणंही जीवावर येतं. कित्येक माणसांची आयुष्यं अक्षरशः याच एका कामावर अवलंबून आहेत. मे  महिन्यात काम संपवून जेव्हा पावसाळी ब्रेक सुरु होतो, तेव्हा काम परत सुरु होईल ना, या विचाराने या माणसांचा जीव कसा वरखाली होतो ते मी पाहिलेलं आहे. एखाद्या आडगावात गेल्यावर तिथली माणसं मोठ्या अपेक्षेने आपले पाण्याचे प्रश्न सांगतात, आणि माझं शिक्षण, ज्ञान असूनही मी काहीच करू शकत नाही, यात नक्की दोष कुणाचा? दीड-दोनशे रुपयांसाठी माझ्यामागे "साब साब" करत फिरणारा कामगार आणि त्याहून कितीतरी जास्त रुपये मिळत रहावेत म्हणून माझ्या बॉसशी नम्रपणे वागणारा मी. फरक फक्त रकमेचाच आहे का?
गांधीजी एके ठिकाणी म्हणतात, माणसाची खरी पारख तो आपल्या कनिष्ठांशी कसा वागतो यावरून होते. आपण ऑफिसर आहोत, gazetted आहोत, या खोट्या अभिमानातून तुसडे होणारे, तुरा मिरवणारे लोक इथे पदोपदी भेटतात. एक परीक्षा पास होऊन ऑफिसर होणे, यात अभिमान वाटण्यासारखं काही आहे असं मला खरंच वाटत नाही. समजा, नापास झालो असतो तर?
ही नोकरी सुरु होण्याआधी मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवत होतो. टेम्पररी. पुढच्या सेमिस्टरमध्ये घेतलं जाईलच याची शाश्वती नाही. महिन्यात किती लेक्चर्स घेतली, किती practicals घेतली त्या हिशोबाने पैसे मिळत, तेही सेमिस्टर संपल्यावर. किती मिळायचे, हे सांगण्यात काही अर्थ नाही आणि औचित्यही नाही, पण गरजा भागत आणि जोडीला भटकंती, डोंगर चढणे, या आणि  उद्योगांसाठी घरी पैसे मागायची गरज नसे. जोडीला माझी डॉक्टरेट चालू होती, त्याचं फिल्डवर्क वगैरे करायला कधीतरी मदत व्हायची. मी दोन वर्षं हे काम केलं, आणि मनापासून एन्जॉय केलं. माझ्या विद्यार्थ्यांनीही  मला फार मोठ्या मनाने सहन केलं. अजूनही मी पुण्याला गेलो तर हे सारे अतिशय प्रेमाने भेटतात, बोलतात. या दोन वर्षांची सर्वात मोठी पुंजी हीच आहे खरं तर. असो. तर एक सेमिस्टर संपली, मे महिना किंवा दिवाळीची सुट्टी आली की मला टेन्शन असे, की पुढच्या सेमिस्टरला मी शिकवणार की नाही? यात पैसे मिळवण्याचा भाग खरंच नव्हता. शिकवण्याचीच मजा इतकी होती, की त्यासाठी मी फुकटही काम केलं असतं.
आज जेव्हा मी काम चालू राहील का नाही, म्हणून अस्वस्थ होणारी ही माणसं बघतो तेव्हा मला माझी आठवण होते. यांना पैशाची गरज आहे, मला कामाची, शिकवण्याची आणि पर्यायाने सतत डोकं चालू ठेवण्याची गरज होती. माझं शिकवणं बंद झालं असतं तर मला माझी डॉक्टरेट होती, . या माणसांचं काम बंद झालं, तर यांना अजून काय आहे? आपलं आयुष्य चांगल्या त-हेने चालू राहावं एवढीच एक ओढ, पण ती जेव्हा अशा पद्धतीने समोर उभी राहते, तेव्हा अस्वस्थ व्हायला होतं.
कबीर म्हणतो, "माया ही मोठी फसवी आहे. (महाठगिनी हम जानी!) पुजा-यासाठी मूर्ती माया, तर तीर्थात पाणी माया. कोणासाठी ती हिरा बनते, तर कोणासाठी कवडी बनून जाते." दोन वेळची चूल पेटती राहावी, ही कोणाचीतरी माया असते, तर कोणी चांगल्या कामासाठी जीव टाकतो. अखेर आपल्या गरजा असतात तरी किती? दीड-दोनशे रुपयांना महाग असलेला कामगार आणि महिना हजारो रुपये मिळवणारा ऑफिसर हे एकाच प्रकारच्या पैशाला बांधलेले. त्यासाठी पडेल ते काम करणारे. फरक फक्त quantityचा. कुठल्या कुठून पुन्हा हे सगळं चक्र फिरून त्याच एका प्रश्नाकडे येतं, की ही सारी धडपड, सारा खटाटोप आहे कशासाठी आणि कुणासाठी? कबीरच पुढे सांगतो, की ही सारी 'अकथ कहानी' आहे. कुणी कुणाला न सांगितलेली, तरी सतत घडणारी. ही साठा उत्तरांची कहाणी आहे, पण ती सुफळ संपूर्ण होईलच असं नाही. शेवटी हा वर ज्याचा त्यानेच मागायचा असतो. मागूनही तो मिळेलच असं नाही. पण निदान आपण काहीतरी मागितलं, ही जाणीव आपल्या  गाठीशी राहिली तरी खूप झालं.

Saturday, May 26, 2012

एका नदीची गोष्ट....

नदी का वाहत असते? कधी विचार केलाय कुणी? पाण्याचा हा अखंड प्रवाह एकाच दिशेला सतत का जात राहतो? कुठल्या प्रेरणा असतात यामागे? कसली आंतरिक ओढ़ असते? जी. एंच्या पत्रांत, माणसाच्या आयुष्याबद्दल बोलताना अनेकदा नाईलचा उल्लेख आला आहे. नाईल जिथून उगम पावते, तिथून ती दोनशे मैल पूर्वेला गेली असती, तर लाल समुद्राला मिळाली असती. पश्चिमेला गेली असती तर अटलांटिक महासागरात विसर्जित झाली असती. पण ती उत्तरेला जाते, आणि हजारो मैल वाळवंट तुडवत भूमध्य सागरात विसर्जित होते. आपण अलेक्झांड्रियाला आलेलो पाहून खुद्द नाईललाच आश्चर्य वाटले असेल! अशा कुठल्या शक्ति असतात, अशी कुठली प्रबळ ऊर्मी असते, जी नाईलला भूमध्य समुद्राला मिळायला भाग पाड़ते?   
गणपती बसवताना कलशपूजा असते. त्या पूजेत कलशाच्या कुठल्या भागात कोणी येऊन बसावं  याची एक जंत्री दिलेली आहे. कलशाच्या पाण्यात कुणी यावं? गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिन्धु, कावेरी यांनी. त्याच्या कुशीमधे असावं सात समुद्रांनी, सप्तद्वीपा वसुन्धरेनी. बाकी ब्रह्मा, विष्णु, रूद्र, गायत्री, सावित्री, वेद  हे नेहमीचे यशस्वी खेळाडू आपापल्या जागी आहेतच. असो. तर  भारतात इतक्या नद्या आहेत, त्यात या सात नद्या पवित्र का मानल्या जाव्यात? लहानपणापासून शेवटच्या क्षणी मुखात गंगा घालेपर्यंत सोबत करणा-या या नद्या. कदाचित या सात नद्यांनी अनेक समृद्ध संस्कृतींचे उदयास्त पाहिले आहेत, माणसाच्या इतिहासाचे कित्येक महत्त्वाचे अध्याय या नद्यांच्या काठी लिहिले गेले आहेत म्हणून या नद्या पवित्र मानल्या गेल्या असाव्यात. घरात जसे फार पाहिलेले, भोगलेले (आणि म्हणूनच शहाणे) माणूस असावे तशा.
पूर्वीच्या काळी गावात एक फार सुन्दर पद्धत होती, की गावात कुठलीही नदी असो, तिला गंगा म्हणायचे. किंवा ज्या गावात नदी नाही, त्याला कुग्राम म्हटलेलं आहे. थोडक्यात, नदी आणि माणूस यांचा फार फार जवळचा सम्बन्ध आहे. जेव्हा माणूस जन्माला आला तेव्हापासूनचं हे नातं. जवळपास सर्व जुन्या संस्कृती नदीकाठी जन्माला आल्या, आणि माणसाने आपली पहिली पावलं नदीच्या साक्षीने टाकली. केवळ पिण्याच्या पाण्याचा न आटणारा स्रोत म्हणून नदीच्या जवळ आलेला माणूस त्या नदीला देव मानू लागला, आई मानू लागला. आज त्याच माणसाच्या करणीने अनेक नद्या मृत्युपंथाला लागल्या आहेत. असो. पण परत तोच प्रश्न आहे, की नदी का असते? ती का वाहते? एका ठराविक मार्गाने जाण्याची तिला का ओढ असते?
मी जेव्हा माझ्या डॉक्टरेटची सुरुवात केली, तेव्हा माझा भर साहजिकच माझ्या मुख्य विषयावर, म्हणजे नर्मदेच्या गाळाच्या खडकांवर होता. या खडकांमध्ये गेल्या 1-2 लाख वर्षांच्या आठवणी जपलेल्या आहेत. प्रत्येक दगड म्हणजे एक इतिहासाचं पुस्तक. त्यांची रचना, त्यांचा पोत, रंग, त्यातले घटक यांचं नदीच्या प्रवाहाशी अतूट नातं आहे. नदी कुठून वाहत होती, तिने वाहता वाहता किती प्रकारच्या खडकांचा सामना केला, तिच्या दिशा कशा बदलत गेल्या, सरळ पात्र बघता बघता नागमोडी कसं झालं, आणि त्या प्रक्रियेत किती प्रचंड बदल झाले या सगळ्या गोष्टी हे दगड बोलू लागले की थक्क व्हायला होतं. मग मजा अशी व्हायला लागली, की नदीच्या या अनेक प्रक्रियांची, तिच्या काठी असलेल्या जीववैविध्याची रोज नव्याने जाणीव होत असल्याने पुन्हा नेहमीचा प्रश्न पडू लागला, की ही नदी का आहे? ही इथूनच का वाहते आहे? किती काळ हिचा प्रवास चालू  आहे आणि किती काळ चालणार आहे?
आपण जर मध्य भारताचा नकाशा नीट पाहिला, तर लक्षात येईल, की नर्मदा आणि तापी या दोनच मोठ्या पश्चिमवाहिनी नद्या आहेत आणि बाकीच्या सा-या नद्या पूर्ववाहिनी आहेत. याचं एक सोपं स्पष्टीकरण देता येईल की  पाणी नेहमीच उताराकडे जातं वगैरे. पण प्रश्न  एवढा  सोपा नाही. दोनच नद्यांना तेवढा पश्चिमेकडे उतार का, हा प्रश्न आहेच. एक फोटो पाहूया.
वर दिलेल्या फोटोमधे एक गोष्ट अगदीच जाणवण्याजोगी आहे की शोण, नर्मदा आणि तापी या एक  ठराविक रेषा पकडून चाललेल्या आहेत. नर्मदा आणि तापी या एकमेकींना समान्तर आहेत, आणि शोण-नर्मदा  तर एकच रेषा आहे. या एकूणच सिस्टिमला आम्ही सोनाटा (SONATA= Son Narmada Tapi) रेषा म्हणतो. 1949 पासून ही रेषा का आहे यावर अनेक मतमतांतरं चालू आहेत. पण या नद्यांना वाहण्यासाठी प्रशस्त मार्ग या सोनाटाने दिला आहे, हे नक्की. आता सोनाटा ही  नेमकी काय भानगड आहे, हे थोडक्यात सांगायचं तर आज आपल्याला जी भारताची (किंवा कुठल्याही देशाची) अखंड जमीन दिसते, ती खरं तर अनेक तुकड्या-तुकड्यांची बनलेली आहे. जेव्हा  पृथ्वीचा जन्म झाला (4.5 अब्ज वर्षं), तेव्हा ती थंड होताना granite आणि तत्सम खडकांचे काही स्थिर भूखंड निर्माण झाले. या स्थिर जमिनीच्या तुकड्यांना craton  म्हणतात. हे cratons अतिशय जुने-पुराणे. त्यांचं वय साधारण 2.9 ते 4 अब्ज वर्षं  सहज असू शकतं. जगातला सर्वात जुना दगड (4.031 ± 0.003 अब्ज वर्षं) हा कॅनडा  मधल्या स्लेव्ह craton मध्ये सापडला. असो.
तर,हे cratons एकमेकांना जोडले जाऊन एक भूप्रदेश निर्माण करतात, आणि नंतर या पुराण पुरुषांवर नवीन खडकांचे थर निर्माण होउन एक सलग जमीन तयार होते (शिल्ड). उदा. भारत. भारतात असे सात craton आहेत. (फोटो पहा: 1-अरवली, 2-बुंदेलखंड, 3-सिंगभूम, 4- बस्तर, 5- पूर्व घाट, 6-धारवाड, आणि 7- दक्षिण ग्रान्युलाईट क्षेत्र).  


भारतातला सर्वात जुना दगड बस्तर craton मधला TT नाईस. त्याचं वय आहे 3.8 अब्ज वर्षं. (नाईस म्हणजे काय, TT म्हणजे काय, हे नंतर कधीतरी.)
 जिथे दोन craton जोडले जातात, त्याला शिवण ( Suture) म्हणतात. काही संशोधकांच्या मते सोनाटा ही अशीच एक शिवण आहे, आणि नंतरच्या अब्जावधी वर्षात ती रुंदावत गेली. म्हणजे, ज्या गोष्टीने नर्मदा-तापी-शोण यांना मार्ग करून दिला, ती जवळपास 2800-3000 दशलक्ष वर्षं जुनी आहे! (खरं आत्ता जे काही सांगितलं, ते सारे कादंबरीचे विषय आहेत! आत्ता सांगायला लागलो तर कायच्या काय फाफट पसारा होईल.) तूर्त आपण सोनाटाला जरा  बाजूला ठेवू, आणि नर्मदेकडे जाऊ.
नर्मदा वाहताना अनेक प्रकारच्या खडकांमधून वाहते. तिच्या उत्तरेला विंध्य पर्वताच्या  रांगा आहेत. इथल्या खडकांचं वय आहे सुमारे 540+ दशलक्ष वर्षं. तिच्या दक्षिणेला गोंडवन खडक आहेत,  त्यांचं वय आहे सुमारे 300+ दशलक्ष वर्षं. पश्चिमेला ज्युरासिक (250+ दशलक्ष वर्षं) खड़क आहेत. दक्षिण-पश्चिमेला दक्खनचे ज्वालामुखी खड़क आहेत, त्यांचं वय आहे सुमारे 65+ दशलक्ष वर्षं. पूर्वेला महाकोशल खड़क आहेत (भेडाघाटचे संगमरवर), त्यांचं वय आहे ~2000-2800 दशलक्ष वर्षं.
आता हे असं का बरं व्हावं? एका नदीच्या उत्तरेला एक प्रकारचे दगड आणि दक्षिणेला दुस-या प्रकारचे असं? मराठीमध्ये याला एक बोजड शब्द आहे प्रस्तरभंग. सुटसुटीत शब्द हवा असेल तर फॉल्ट . हे फॉल्ट जमिनीत चाललेल्या हालचाली, गडबडगोंधळ दाखवतात. होतं काय, की काही कारणामुळे दोन दगडांमध्ये भेगा पडतात (Fracture!). या भेगांवर जमिनीच्या काही हालचालीमुळे जर अजून ताण आला तर या भेगेच्या दोन बाजूचे दगड एकमेकांवरून घसरतात. आणि मग सगळी उलथापालथ होते. नवीन दगड जुन्यांच्या समोर जाउन बसतात, जुने दगड वर येतात वगैरे. नर्मदेच्या उत्तरेला आणि दक्षिणेला असे दोन faults आहेत. उत्तर नर्मदा फॉल्ट आणि दक्षिण नर्मदा फॉल्ट. गूगल अर्थ किंवा तत्सम सॉफ्टवेर मधे जर नर्मदा पाहिली, तर हे दोन्ही फॉल्ट अगदी स्पष्ट दिसतात. सोनाटा पण जवळपास सिक्किम पर्यंत जाताना दिसते (भूवैज्ञानिकांसाठी सूचना- नसते रेफरंसेस देऊन माझ्या चुका काढल्या तर खबरदार!)  असो.
या सा-या गोंधळाच्या बरोब्बर मधे माझं प्रेमपात्र. नर्मदेच्या गाळाचे खडक. हे तरुण आहेत. फार फार तर काही लाख वर्षं जुने. अगदीच परवापरवाचे.(खालच्या फोटोत गुलाबी-ब्राऊन रंगाच्या विन्ध्य खडकांवर बसलेले माझे गाळाचे खडक. त्यावर हात ठेवलेला मी.) 


तर हा सारा प्रचंड प्रचंड काळ. साधारण 2-3 अब्ज वर्षांचा. या सा-या कालावधीत काय कल्प घडून गेलं असेल...अनेकदा समुद्राचं जमिनीवर आक्रमण झालं असेल, तेही हजारो मैल आतपर्यंत. त्याच्या खुणा या सहा-सात कोटी वर्षं जुन्या खडकांनी जपलेल्या आहेत. या खडकांचं रूप आता इतकं बदलून गेलं आहे कि कधीकाळी आपण समुद्राकाठची वाळू होतो, यावर त्यांचाही विश्वास बसू नये. असे एकावर एक साचत गेलेले थर इथे आहेत. प्रत्येक थराची निराळी गोष्ट. प्रत्येक वेळी बदलत गेलेली समुद्राची खोली आणि लाटांची अगणित चक्रं. अनेकदा आलेली हिमयुगं. अफाट ताकदीच्या हिमनद्या आणि त्यांनी वाहून आणलेले भीमकाय धोंडे. जमिनीच्या प्रचंड तुकड्यांची हालचाल. त्यांना पडलेल्या घड्या, शिवणी (सोनाटा अशीच एक!). भूकंप. गगनचुम्बी वृक्षांची जंगलं. सतत बदलत्या नदीच्या दिशेने त्यांच्यावर साठलेला गाळ. त्यांचं जमिनीखाली गाडलं जाणं. परत नवीन जंगल. मग Dinosaurs. त्यांचा अंमल असलेली पृथ्वी. उल्कापात, ज्वालामुखी, विध्वंस.आणि मग अनेक अनेक वर्षांनी माणसाचं पहिलं पाऊल....परत अश्मयुग ते आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास. एका नदीसोबत चाललेली सा-या विश्वाची यात्रा.  
म्हणजे, एका नदीची गोष्ट सांगायला सुरुवात केली तर कितीदा कालचक्राच्या फे-या माराव्या लागतात...गंगा-यमुना-सिंधू  यांचा प्रवास म्हणजे भारतीय भूपृष्ठाचा प्रवास. म्हणजे साधासुधा नाही, तर तब्बल 61  दशलक्ष वर्षांचा प्रवास आणि युरेशियन भूपृष्ठाशी  त्याची झालेली टक्कर.ही गोष्ट म्हणजे हिमालयाची गोष्ट.
तापी-नर्मदेची कहाणी सुरु होते ती भारतीय भूमि कशी  तयार झाली इथपासून. अजून चिकाटी असेल तर थेट पृथ्वीच्या जन्मापर्यंत. या अचाट  विस्तारात आपण किती छोटे आहोत याची पदोपदी जाणीव होत राहते फक्त. नदीचं मूळ शोधू नये म्हणतात ते म्हणूनच  असावं कदाचित.

Tuesday, May 1, 2012

मा रेवा थारो पाणी निर्मल...

"वा वा, डॉक्टरेट करतोयस का? कुठल्या विषयात?"
"जीओलॉजी मध्ये" 
"अच्छा, झुलॉजी!!"
"नाही हो,  जीओलॉजी"
"बरं, म्हणजे ते उत्खनन वगैरे! वा वा!"
"नाही नाही, ते आर्कीऑलोजी हो काका.."
"बरं, बरं, म्हणजे ते डायनोसोरची अंडी, ज्वालामुखी वगैरे! आम्ही पाहतो ना डिस्कव्हरी वर. छान छान!"
"नाही म्हणजे...हो म्हणजे...आता कसं सांगू?"
"बरं, मग नक्की विषय काय तुझ्या डॉक्टरेट चा?"   

पुढचा संवाद लिहिण्यात खरंच काही अर्थ नाही. या इंग्लिश सिनेमांनी निर्माण केलेला हा घोळ आहे. खरं सांगू का? आमचं काम अत्यंत रुक्ष आणि कंटाळवाणं असतं (पाहणा-यासाठी). गंमत, किंवा काहीतरी adventure म्हणून सोबत येणारे, गावात गेल्यावर बघे गावकरी, हे  पाच मिनिटात माघार घेतात असा माझा अनुभव आहे. त्यात मी sedimentologist. जगातले सगळे चक्रम बनवून झाले, तेव्हा देवाने त्यांचा अर्क काढून काही मोजके नमुने निर्माण केले, ते हेच. आमचा कुठला ना कुठला स्क्रू ढिला असतो हे प्रथमदर्शनीच लक्षात येतं. असो. थोड्या टेक्निकल गोष्टी सांगतो, म्हणजे पुढच्या (रटाळ) लिखाणात काही अडायला नको. अजून माहिती हवी असल्यास इथे मिळेल. यापुढे दिलेल्या लिंक अजून माहिती हवी असेल तर खरंच उघडून पहा.

Geologist म्हणजे भूशास्त्रज्ञ. यातले प्रमुख दोन प्रकार म्हणजे फिल्ड geologist  आणि lab  geologist. दोन्ही प्रकार सारखेच चक्रम असतात. अजून तीन प्रमुख प्रकार म्हणजे igneous (अग्निजन्य), sedimentary (स्तरीत) आणि metamorphic (रूपांतरित) या खडकांवर काम करणारे. पैकी पहिला आणि तिसरा प्रकार हे काय बोलत असतात देव जाणे. यांच्या उड्या मोठ्या. एकदम हजार किलोमीटर जमिनीखाली किंवा थेट मिटीओराईट्स.  मी मुख्यत्वे sediments वर काम करतो, आणि फिल्ड आणि lab  या दोन्ही प्रकारात मोडतो. आम्ही फार उड्या मारत नाही. आमची धाव surface वर. फार फार तर काही किलोमीटर खाली किंवा समुद्राचा तळ. असो.
आम्ही काळाच्या बाबतीत अत्यंत उदार लोक आहोत. दहा लाख वर्षं म्हणजे अगदी परवा परवाचा काळ. फार जुना काळ म्हणजे तीनशे कोटी वर्षं वगैरे. पृथ्वीचा जन्म झाला चारशे साठ कोटी वर्षांपूर्वी, आणि तेव्हापासून आत्तापर्यंतच्या काळाचे आम्ही  चार  तुकडे केले आहेत. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, आणि क्वाटरनरी. (खरी नावं जरा गजबज आहेत. फारच  कुतूहल असेल तर..)
मी ज्या कालखंडावर काम करतो आहे तो आहे  क्वाटरनरी. सुमारे २.६ दशलक्ष ते १०,००० वर्षांपूर्वीचा हा काळ पृथ्वीच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा काळ आहे. आज जी काही जमिनीची रचना आपण पाहतो, तिची पायाभरणी याच काळात झालेली आहे. अनेक 'आईस  एजेस' याच काळात येऊन गेली आणि माणसाची उत्क्रांती याच काळात झाली. आज वाहणा-या गंगा, यमुना, नर्मदा या नद्या  त्याही काळात वाहत होत्या, आणि त्यांनी आणलेल्या गाळात आजही त्यावेळच्या आठवणी जपलेल्या आहेत.

नीट पाहिलं, तर लक्षात येतं की नर्मदेचा त्यावेळचा (२.६ दशलक्ष वर्षं पूर्वील) परिसर हा एखाद्या आफ्रिकन मैदानासारखा होता. काय काय मिळतं तिच्या गाळात? हत्ती, पाणघोडे, मगरी, गायी, काळवीट, म्हशी यांची हाडं, दात. शंख शिंपले. माणसाची एक कवटी (१९८४ मध्ये डॉ. अरुण सोनाकीया यांना सापडली. भारतातला आदिमानवाचा एकमेव विश्वसनीय पुरावा) झाडांची जुनी, दगड झालेली मुळं. अश्मयुगीन हत्यारं. याशिवाय अनेक वेळा भूजल पातळीत बदल झाल्याच्या, नदीची दिशा बदलल्याच्या  खुणा या गाळाच्या खडकांनी जपलेल्या आहेत. नदीला पूर येतो तेव्हा अतिशय बारीक वाळू (फ्लडप्लेन silt) ती आपल्या पात्राच्या  बाजूला आणून टाकते. अशा silt चा अफाट विस्तार. म्हणजे अगदी परवा परवा ही नदी  कशी जबरदस्त असेल..हिच्या पुरांनी किती वेळा कल्लोळ माजवला असेल..जेव्हा गोटे, वाळू, नदीतून वाहतात तेव्हा त्यांचं एकूण प्रमाण, आकार, रचना यावरून त्या नदीचा वेग, दिशा यांचं अनुमान करता येतं. नदीची वळणं कशी बदलत गेली, तिचं पात्र कसं होतं, सरळ का नागमोडी हे सांगता येतं. हे झालं अगदी वरवरचं. जेव्हा microscope किंवा  इलेक्ट्रोन microscope ची दुनिया समोर उघडते तेव्हा अजूनच थक्क व्हायला होतं. लहानशा वाळूच्या कणात माहितीचा समुद्र. नदीतून झालेल्या प्रवासाच्या अगणित खुणा. पाण्यात विरघळलेल्या क्षारांनी उमटवलेले खळगे. दगडाचा 2X2 से.मी आकाराचा तुकडा, त्याचा ठसा  त्याच्या सगळ्या प्रवासाची कहाणी सांगतो आहे. वाळूचा एक एक कण आपण कुठून आलो हे सांगतो आहे. झाडांच्या मुळांनी अन्न मिळवताना केलेल्या खटपटी या लहानशा ठशात स्पष्ट दिसतायत. लाखो वर्षांपूर्वी कोसळलेल्या दरडी आजही इथल्या डोंगरपायथ्याशी तशाच आहेत. एक एक गोष्ट अशी उलगडत जाते. नदीचा सारा प्रवास दिसायला लागतो. अनेक बदल. त्या बदलांनी आकारलेलं निसर्गचक्र. या सा-या अफाट पसा-यात मी कुठे आहे? माणूस कुठे आहे? या नदीकाठी दगडाची हत्यारं करणारा माणूस आज नर्मदेवर बांध घालतो आहे, पूल बांधतो आहे. नदीत जसा बदल होत गेला तसा माणसातही. बदललेल्या माणसाने परत नदीत बदल केले. आता पुढचा बदल आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? आज नर्मदेकाठी काम करताना वाळूत पाउल उमटल्यावर सहज विचार येतो, की पुढच्या पुरात या  ठशावर वाळूचं पांघरूण घातलं जाईल. काही हजार वर्षांनी कोणीतरी जेव्हा हा वाळूचा दगड फोडेल तेव्हा त्याला तो दिसेल. काय कल्प घडून गेलेलं असेल तोवर? तोवर माणूस असेल का? असला तर ही नदी असेल का? नदी नसली तर माणूस तरी का असेल?

नर्मदामाई अनादीकाळापासून (म्हणजे क्वाटरनरीच्या आधीपासून) वाहते आहे.आजही वाहते आहे.  गेली तीन वर्षं मी या नदीमध्ये काम करतो आहे. मध्य प्रदेशातल्या भोवंडून टाकणा-या उन्हात मी फिरलो आहे, इथली सुरेख थंडी मी पहिली आहे. नर्मदेकाठी दिसणारे अप्रतिम सूर्यास्त, काळवीटांचे देखणे कळप मी पहिले आहेत. जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा मी नर्मदेत दिवे सोडलेले आहेत. आईशी खेळावं, दंगामस्ती करावी तसा मी या नदीच्या अंगाखांद्यावर खेळलो आहे, पोहलो आहे. उंच किना-यावरून खालच्या अथांग पात्रात मी अनेकदा उड्या मारल्या आहेत.  पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे  इथल्या माणसांनी मज वनवाशाला अकारण स्नेह दिला आहे. मी जे काम करतो आहे त्याने त्यांचा काही फायदा नाही. त्यांच्या आयुष्यात या कामाने काहीच फरक पडणार नाही, हे मला आणि त्यांनाही माहित आहे. तरी मी उन्हात थकून बसलेलो असताना कितीकदा यांनी मला पाणी दिलेलं आहे, नको नको म्हणत असताना घरी नेऊन पाहुणचार केलेला आहे. काहीजण केवळ मदत करायची म्हणून माझी जड हातोडी आणि दगड भरलेली bag घेऊन माझ्यासोबत भर उन्हात चालले आहेत. कित्येक परिक्रमावासींनी काहीही न घेता, न मागता माझ्यासाठी तोंडभरून आशीर्वाद दिले आहेत. वाट चुकल्यावर मला बरोबर वाटेवर पोचवायला काहीजण मैलोनमैल चालले आहेत. अनेक जणांनी आलेल्या पाहुण्याला चांगले दगड दाखवायचे म्हणून आपली कामं सोडून मला उत्तम sections दाखवले आहेत. याइथे काम करताना मजसारख्या नास्तिकाच्याही मनात हालचाल व्हावी इतका  इथल्या लोकांचा त्यांच्या नर्मदामैय्येवर जीव आहे. न दिसणा-या देवापेक्षा सतत सोबत असलेली नदीच बरी, नाही का? 

हा प्रवास काही फार भव्य नाही. मी सामान्य आहे, माझा प्रवासही तसाच छोटा आहे. त्यात काही असामान्य घडणार नाही. पण जे मला न मागता मिळालं आहे त्यानेच माझी झोळी भरून गेली आहे. हा प्रवास अजून संपलेला नाही. संपू नये अशी माझी इच्छा आहे. डॉक्टरेटची एक सुरळी कधी मिळायची ती मिळेल. पण तो या प्रवासाचा शेवट ठरू नये. जिथे तिथे माझे जुळलेले धागे सलग राहावेत म्हणजे झालं...