Search This Blog

फेसबुक वर भेटायचं असेल तर..

Thursday, February 17, 2011

कळे न मी पाहते कुणाला, कळे न हा चेहरा कुणाचा!! (भाग पहिला)

कधीतरी असं होतं का तुम्हाला? लिहायचं म्हणून बाह्या सरसावून बसलं की काहीच सुचत नाही...आणि बाकीच्या वेळी मात्र डोक्यात इतका गोंधळ चालू असतो की दुसरीकडे लक्ष लागता लागत नाही. पण laptop समोर घेऊन बसलो किंवा कागद पेन समोर ओढले की सारे गोंधळ कसे गप्पगार..वाटतं की आपण किती छान गधडे झालोय, आपल्याला कशाचा त्रासच नाही..आपण विचारच नाही करत कसलाही. या सुखात उठलो की पुन्हा डोक्यात छिन्नी चालू होते. आपणच आपल्या मनाचे टवके उड़वायचे आणि कागदावर मांडून त्यांच्याकडे पाहत बसायचं असा खेळ परत बोलवायला लागतो. असं झालं की मी हल्ली निरर्थक विचार करायला शिकलो आहे..पोतंभर निरर्थक विचार जमले की ते लिहून काढायचे..
आपण सतत एकाच वास्तवात का गुरफटून बसतो? आपण त्याच नात्यांच्या गुंत्यात का अडकतो? आपल्याला सतत एकाच प्रकारच्या नोक-या का मिळत राहतात? आपल्या अवतीभवती असलेल्या अगणित शक्यता आणि पर्याय यांतून आपण एकाच प्रकारचे पर्याय का निवडतो?का आपल्याला या शक्यता माहितीच नसतात? आपण आपल्या रोजच्या आयुष्यात असे काही गुंतून जातो, की आपल्याला वाटायला लागतं की आपण कोणीच नाही या जगात. आपण नियति नाही बदलू शकत. आपल्या आत जे जग आहे, त्यापेक्षा बाहेरचं जग फार वेगळ आहे, आणि जास्त खरं आहे.
गेल्या काही वर्षात बदललेलं material science याच्या अगदी विरुद्ध सांगतं. त्यानुसार जे आपल्या आत घडतं, त्यावर बाहेरचं जग आणि वास्तव बदलतं. पूर्वीचे तत्वज्ञ सांगत की जर का मला ठेच लागली तर ती जाणीव खरी आहे, वास्तव आहे, कारण ती मी अनुभवू शकतो. पण हा देखील अनुभव आहे, त्याला खरं का म्हणायचं? मग जे पाहतो ते वास्तव का?
आपण जेव्हा पाहतो, तेव्हा मेंदूमधले काही भाग काम करतात. जेव्हा डोळे बंद करून आपण काहीतरी पाहतो, किंवा स्वप्न पाहतो, तेव्हाही तेच भाग काम करतात. मग पाहतं ते कोण? डोळे की मेंदू? आणि वास्तव काय आहे? डोळे पाहतात ते का मेंदू पाहतो ते? खरी गोष्ट अशी आहे, की माणसाचा मेंदू दृश्य आणि स्मरण याच्यात फरक करू शकत नाही. मानवी मेंदू रोज जवळजवळ 40GB माहिती प्रोसेस करतो, पण त्यातली फ़क्त 20KB आपल्याला जाणवते. हे 20KB असतात आपला परिसर, आपलं शरीर आणि वेळ यासाठी. याचा अर्थ असा आहे की आपण फ़क्त हिमनगाचं टोक पाहतो आणि त्यालाच खरं मानतो.
मेंदूचा visual cortex हा भाग खरं तर पाहतो. आणि तो फ़क्त अशाच गोष्टी पाहतो की ज्या त्याच्यालेखी ख-या आहेत. एक गोष्ट सांगतात, की जेव्हा कोलंबस वेस्ट इंडीज मधे पोचला, तेव्हा तिथल्या आदिवासींना त्याची जहाजं दिसलीच नाहीत, कारण त्यांनी पूर्वी जहाज पहिलंच नव्हतं. मग काही हुशार लोकांनी जहाजामुळे उठणा-या लाटांचा अभ्यास केला, आणि त्यांना जहाजं दिसली! म्हणजे आपण तेच पाहतो जे खरं आहे, शक्य आहे. म्हणजे कितीतरी गोष्टी आपण पाहतच नाही....आणि जे आपण पाहतो त्याचं प्रतिबिम्ब आपल्या आठवणीत असतंच..मग आपण पाहतो का आठवतो? आपल्या मेंदूला सत्य आणि आभास यात फरक करता येत नाही. मग आपण पाहतो ते काय आहे?
आता थोड़ा अजून विचार करुया. प्रत्येक गोष्ट ही अणू-रेणू ची बनलेली आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे . आपल्याला शाळेत जे चित्र दाखवतात, त्यात अणु भरीव चेंडू सारखे दाखवतात. पण प्रत्यक्षात विचार केला तर proton आणि neutron हे अत्यंत छोटे आणि नगण्य आहेत, आणि त्यांच्याभोवती electron चा एक ढग आहे. यामधली जागा ही vacuum . म्हणजेच, प्रत्येक वस्तू ही अशा vacuums ची बनलेली आहे. जितका अणु मोठा तितकी vacuum मोठी. मग कुठल्याही वस्तूच्या आस्तित्वाला काय अर्थ आहे? कारण ज्याला mass आहे, ते अतिशय कमी, नगण्य जागा व्यापतात, आणि उरलेली जागा ही पोकळी असते..आता electron ज्या ढगात फिरतात, तो probability चा ढग आहे, आणि त्यात 'n ' इतक्या शक्यता आहेत!!
क्वांटम फिजिक्स नुसार क्वांटम एकमेकांना superpose करतात. म्हणजे एक mass एका वेळी 'n ' जागी असण्याची शक्यता असते . जेव्हा आपण पाहतो तेव्हा एक शक्यता आपल्याला दिसते. जेव्हा आपण पाहत नाही तेव्हा तेच mass किंवा matter म्हणूया, परत या अगणित शक्यतांमध्ये फिरायला लागतं!! मग ही शक्यता कोण निवडतं?
फिजिक्स मधे 'observer ' ही एक धमाल कल्पना आहे. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करुच शकत नाही!
पण हा 'observer ' तरी कोण आहे? डोळे का मेंदू?
फार झाला आचरटपणा. उरलेलं नंतर कधीतरी.

Wednesday, February 9, 2011

मुकुल शिवपुत्र- एक अनुभव

लोक जमलेले आहेत. जरिकाठी साड्या आणि झब्बे घालून. गज-यांचा वास..
रंगमंचावर मागे फुलं-बिलं..समोर समया..तबला आणि पेटी आपापल्या जागी बसलेले आहेत. मधूनच थोडी ठाक-ठूक..तानपु-यांचे कान पिळणं..सारं काही सुरात लागलेलं.
कोणीतरी थोडी प्रस्तावना करतो. टाळ्या. गायक प्रवेशतो.
हा सा-या मैफलिपासून आलिप्त. काहीसा निर्विकार.
दाढी वाढलेली, केस कसेतरी बसवलेले. साधा केशरी झब्बा, पांढरी लुंगी आणि एक शबनम.
आल्याआल्या तो तानपु-यांकडे साशंक नजरेने पाहतो..एक एक तानपुरा हातात घेउन कमालीच्या एकाग्रतेने ते जुळवतो..
पाणी वगैरे हव्या त्या जागी आहे.
आता मैफलीत शांतता..फ़क्त तानपुरे आणि पेटीचा सुर लागला आहे.
विलक्षण गंभीरपणे तो षड्ज लावतो. शांत, गहन आणि अत्यंत घुमारदार..
निषादावर क्षणभर विसावून, रिषभाला हलका स्पर्श करून याचा आवाज पुन्हा षड्जावर स्थिर होतो.
पुन्हा पंचम, निषाद, पुन्हा षड्ज..जीवघेणी शांत आलापी बराच वेळ...
रागस्वरूप पूर्ण स्पष्ट झाल्यावरच तो बंदिश चालू करतो..
हलकेच तबला सुरु होतो...मध्यलय, सहज ठेका.
आता प्रेक्षक, मैफल याच्या खिजगणतितही नाही.
याला आता स्वत:ची जाणीव नाही..याचं आस्तित्व आता अलग नाही.
आता हा षड्ज आहे, धैवत आहे, निषाद-गंधार आहे, मध्यम आहे, पंचम आहे....
याच्या प्रत्येक सुरात पहाट दिसते आहे..
याची प्रतिभा नवेनवे उन्मेष दाखवते आहे..
पाहता पाहता गायक पुसला जातो. आता रंगमंचावर मूर्तिमंत तोडी प्रकटली आहे.
क्षणाक्षणाला रूप बदलते आहे, अनिर्बंध संचार करते आहे...
डोळ्यात पाणी येतं, पण ते पुसायला हात धजावत नाही..
सारी मैफल स्थिर आहे..हलकीशी हालचालपण दिसत नाही कुठे.
मध्यलय ते द्रुत हा प्रवास विलक्षण अलगदपणे होतो.
आता गाण्याचा वेग वाढला आहे.
वेगवान ताना..एक तान दुसरीसारखी नाही..गुदमरून टाकणारा वेग..
द्रुत बंदिश संपते, तराणा संपतो..टाळ्यांचा कडकडाट..
हा परत निर्विकार.
निर्विकारपणे तो भैरवी सुरु करतो.
आता तालाला जागा नाही..
करुण, आर्त बंदिश..तितकेच करुण सूर..
भैरवी संपते. परत टाळ्यांचा कडकडाट..
प्रेक्षक उठून जाऊ लागतात..रंगमंदिर रिकामं होतं.

रंगमंचावर दोन तानपुरे, आणि आपल्यातच हरवलेला मुकुल शिवपुत्र..........